इतर

सहकार क्षेत्रातील नेतृत्वामध्ये कुरूपाची भावना निर्माण झाली.- दिनानाथ ठाकूर

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना येथे कारखाना सबलीकरण संदर्भात कार्यशाळा.

टिम: विजयदिप न्यूज.

सहकाराचे पतन थांबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून सहकार क्षेत्रातील नेतृत्वामध्ये कुरूपाची भावना निर्माण झाली आहे. त्यांचा विश्वासही लयास गेला असल्याचे मत सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी साखर कारखाना सबलीकरण यासंदर्भातील कार्यशाळा श्रीपुर (ता.माळशिरस) येथे संपन्न झाली त्यावेळी ठाकूर बोलत होते.

ज्या सहकाराने महाराष्ट्राला व देशाच्या अर्थव्यवस्थेला आश्रय दिला तोच सहकार आज अश्रित झाला असल्याची खंत दीनानाथ ठाकूर यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्र ही सहकाराची भूमी म्हणून देशात गणली जाते. देशाचे भवितव्य कृषी क्षेत्रात तर कृषी क्षेत्राचे भवितव्य सहकार क्षेत्रात असल्याचे सांगत सहकार मजबूत झाला तर बेरोजगारीची समस्या आपोआप सुटेल असे ठाकूर यांनी सांगितले.

राष्ट्रीय साखर संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यावेळी बोलताना म्हणाले की, भारत दरवर्षी अकराशे लाख टन उसाचे गाळप करतो यातून चाळीस हजार कोटींची उलाढाल होते. जगातील कोणताही देश भारताच्या जवळपास देखील नसल्याचे नाईकनवरे म्हणाले. सहकारात महाराष्ट्रा इतकी सामाजिक बांधिलकी कोठेही आढळून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात सहकारी साखर कारखानदारी अतिशय निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केल्यानंतर ३४ वर्षांपासून अडकलेली आयकाराची टांगती तलवार काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला तीस ते पस्तीस हजार कोटींचा बसणारा फटका वाचला असल्याचे नाईकनवरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांनी साखर कारखाना व त्याच्या व्यवस्थापनात बदल करून कारखान्याच्या खर्चास कशा प्रकारे आळा घालता येईल याचे सविस्तर विवेचन दिले. सतत वाढणारी एफआरपी आणि स्थिर राहिलेली साखरेची एमएसपी यातील तफावत दूर करण्यासाठी आम्ही विशेष दक्षता घेत असल्याचे संजय खताळ यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे, दिनकरराव मोरे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, सहकार भारतीचे संचालक डॉ.उदय जोशी, विवेक जुगादे, चंद्रकांत काळे, पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश जिरगे यांच्यासह महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा कर्मयोगी परिचारक पांडुरंगचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी साखरेवरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी यावेळी लावून धरली. देशांतर्गत बाजारात ३१०० पर्यंत साखरेचे दर आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात साडेचार हजारापर्यंत साखर विकली जात आहे. त्यासाठी निर्यातीला परवानगी द्या. त्यामुळे कारखान्यांना प्रति क्विंटल हजार ते बाराशे रुपये पर्यंत लाभ वाढेल असे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. सलग सात वेळा उसाची एफआरपी वाढवली मात्र साखरेची एमएसपी जाहीर केल्यानंतर एकदाही वाढली नाही. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत येत आहे. आज सत्तर वर्षानंतर सहकारी साखर कारखाना सबलीकरणाची कार्यशाळा घ्यावी लागत आहे. खाजगी भांडवलशाहीला पायबंध घालण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!