श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नामविस्तारीकरण… “कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपूर”

टिम: विजयदिप न्यूज
देशपातळीवर नावलौकिक असणार्या श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नामविस्तारीकरण करण्यात आले असून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या नावाने आता हा कारखाना ओळखला जाईल. नामविस्तार सोहळा शुक्रवारी (दि.३१) रोजी पार पडला. यावेळी चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक यांनी शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण हितासाठी पांडूरंग परीवार सदैव प्रयत्नशील राहील याची ग्वाही दिली.

नामविस्तार सोहळा तसेच शेतकरी मेळाव्यास कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक, हवामान अभ्यासक पंजाबराव डख, ‘युटोपीयन’चे अध्यक्ष उमेश परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या सह सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी वर्ग आणि श्रीपूर-महाळूंग मधील विविध राजकीय व सामाजिक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, ‘पांडुरंग सहकारी’चे नामविस्तारिकरण करून ‘कर्मयोगी सुधाकपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना’ असे करण्यात यावे अशी सभासदांची इच्छा पूर्ण झाली. परंतु कै.सुधाकरपंतांच्या नावाला साजेसे काम करण्याची आपली जबाबदारी वाढली आहे. सुरवातीला प्रति दिन १ हजार मे.टन ऊस गाळप क्षमता असणारा आपला कारखाना, प्रती दिन १० हजार मे.टन ऊस गाळप करण्याच्या क्षमतेसह सुसज्ज होत असून या नेत्रदिपक प्रगतीमागे श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांचे योगदान, आपल्याला विसरता येणार नाही. १९८६-८७ पासून महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यात आदर्शवत होईल असे काम कारखान्याच्या वतीने करण्यात आले यात संचालक मंडळ, सभासद, शेतकरी, कामगार सर्वांचे योगदान महत्वाचे आहे.
पुढे बोलताना चेअरमन मा.आ.परिचारक म्हणाले, बँक अधिकारी, शासकीय अधिकारी यांच्या मिटिंग असतात त्यावेळेस साखर कारखानदारीचा विषय निघतो त्यावेळेस अधिकारी सांगातात की, महाराष्ट्रात जे चांगले दोन-चार कारखाने आहेत त्यामध्ये ‘पांडुरंग सहकारी’ आहे. आणि त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटतो. सभासदांनी टाकलेला विश्वास टिकवायचा असेल तर कारखाना विस्तारीकरण करणे ही काळाची गरज आहे. लोकांची मानसिकता बदललेली असून पूर्वी गळीत हंगाम सहा महीने चालायचा परंतु आता चार महीने सुद्धा चालत नाही. आणि शंभर दिवसात ऊस गेला पाहिजे अशी मानसिकता ऊस उत्पादक शेतकर्यांची झाली आहे.
शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले की, येणाऱ्या २०२३ या पावसाळी हंगामात मागील वर्षाच्या २०२२ साली पडलेल्या पावसाप्रमाणेच भरपूर पाऊस पडणार असून पाऊस येण्याअगोदर निसर्ग आपल्याला कश्या प्रकारे सुचित करतो याचीही अनेक उदाहरणे दिली. हवामानाचा अंदाज समजून घेऊन शेतकरी बांधवांनी शेती विषयक कामांचे नियोजन केले तर पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल असा सल्ला डख यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला.
चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. तसेच त्यांना सातत्यपूर्ण नाविण्याचा ध्यास असून कारखान्याची प्रगती आणि विकास ध्याना मनात ठेवून ते सातत्यपूर्ण आपले कामकाज करत असतात.
डॉ.यशवंत कुलकर्णी,
कार्यकारी संचालक.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, दिलीपराव चव्हाण, हरीष गायकवाड, उमेशराव परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजीराव वाघमोडे, बाळासो यलमार, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरु वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.
कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.सुधीर पोफळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.