माळशिरस तालुक्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा!

आ.राम सातपुते यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
टिम: विजयदिप न्यूज
बुधवारी सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यामुळे माळशिरस तालुक्यातील केळी, आंबा, नारळ, पेरू, द्राक्षे, सीताफळ, डाळिंब, ड्रॅगन फूड या फळबागांसह झेंडू, गुलाब, शेवंती आदी फुल बागांचे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस उनमळून पडल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर अनेकांच्या घरावरील पत्रे व छप्पर वाऱ्याने उडून गेल्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माळशिरसचे आ.राम सातपुते यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ऐन उन्हाळ्यात तळ हातावरील फोडाप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा जपल्या होत्या, परंतु जोराच्या वाऱ्यामुळे व अवकाळी मुळे केळीच्या बागा जमीन दोस्त झाले आहेत माळशिरस तालुक्यातील जवळपास ५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला असून काही ठिकाणी तर टॅंकरने पाणी देऊन बागा जोपासल्या होत्या परंतु वादळी वाऱ्याने व अवकाळी ने क्षणार्धात या बागा जमीन दोस्त झाल्या यामुळे शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातच प्रशासनाकडून पंचनामा करण्याकरिता दिरंगाई केली जात आहे. काही ठिकाणी नुकसान होऊन देखील गाव कामगार तलाठी जाणीवपूर्वक दखल घेत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता माळशिरसचे आ.राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे माळशिरस तालुक्यातील बाधित सर्व क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी द्यावेत यावर निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊन बळीराजाला योग्य ती मदत सर्वतोपरी केली जाईल असे सांगितले अवकाळी व वादळी वारे होऊन दोन दिवस उलटले तरीही बऱ्याच ठिकाणी प्रशासनाकडून पंचनामे करण्याकरता जाणीवपूर्वक दिरंगाई जे अधिकारी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळ निधी अनुदान मिळाले आहे दुष्काळ असल्याने पिके नाहीत मग कोणत्या पिकांची नुकसान भरपाई शासन कशी देणार? याचबरोबर एका पिकाकरिता एका वर्षात दोनदा शासनाकडून मदत दिली जाणार का? असे प्रश्न अनुत्तरीत आहेत मात्र दुष्काळ निधी देत असताना शासनाकडून १००% दुष्काळ निधी न देता ६० टक्के तर काही ठिकाणी यापेक्षाही कमी दुष्काळ निधी दिला आहे यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन बळीराजाला आधार द्यावा अशीही मागणी समोर येत आहे.
तलाठी अयोध्येला शेतकरी वाऱ्यावर
वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा फटका माळशिरस तालुक्यातील पूर्व भागाला बसला असून माझी अकलूज-माळेवाडी येथील ५ एकर केळीची बाग भुईसपाट होऊन १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आमचे गाव कामगार तलाठी अयोध्या वारी करण्यासाठी गेले आहेत. ते आल्यानंतर आमचा नुकसानीचा पंचनामा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. यामुळे तलाठी अयोध्येला व शेतकरी वाऱ्यावर अशी म्हणण्याची पाळी आमच्यावर आली आहे.
राजेंद्र बोडके,
केळी उत्पादक शेतकरी.
माझे १ हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती. त्याच्या काढणीचा कालावधी कांही दिवसावर असतानाच वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. उघड्या डोळ्यांनी केळीचे खुट जमीनदोस्त होताना पाहताना काळजाचा ठोका चुकत होता. या वादळी वाऱ्यामुळे माझे अंदाजे ११ ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून ते भरून निघने शक्य नाही. यामुळे माझे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले असून माझ्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने मदत करावी ही विनंती.
सचिन माने-देशमुख,
नुकसानग्रस्त शेतकरी.