महापूरग्रस्त चिपळूणमधील ऐतिहासिक कामगिरी बद्दल संजय हेरवाडे यांचा गौरव.

राजा माने
मुंबई: महापूरग्रस्त चिपळूण शहराला कचरा, चिखल आणि आरोग्याच्या असंख्य समस्यांतून मुक्ती देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी गौरव करण्यात आला.

महापुराच्या संकटाने चिपळूण अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. चिखल, कचरा आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराईचे संकट गावावर घोंगावत होते. यासंकटातून चिपळूणला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र मदतीला धावला होता. अशा परिस्थितीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विपिन शर्मा यांनी तातडीने बैठक घेतली. मंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडे तेथील आपत्ती व्यवस्थापनाची मोहीम मोठ्या विश्वासाने सोपविली.
तब्बल २५ हजार टन चिखल, कचरा
संजय हेरवाडे यांनीही जिद्द, व्यवस्थापन कौशल्य आणि टीमवर्कच्या बळावर पूरग्रस्त चिपळूण शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ऐतिहासिक कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. तब्बल २५ हजार टन चिखल, कचरा काढून शहर पूर्वपदावर आणण्यासाठी कष्ट घेतले.
नानासाहेब धर्माधिकारी, धर्माधिकारी प्रतिष्ठान, नाणिज संस्थान, संत निरंकारी मंडळ, असंख्य स्वयंसेवी संस्थां आणि चिपळूण, नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या सुमारे आठशे कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन आणि समन्वय मोठ्या खुबीने साधला.
संजय हेरवाडे यांनी केलेल्या या कार्याचा गौरव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने ठाणे जिल्हा नियोजन भवनात हा सोहळा पार पडला.