राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलल्या.

टीम विजयदिप न्यूज.
राज्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुका तब्बल पाच महिने पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सातव्यांदा सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या निवडणुकांना दि.३१ ऑगष्ट २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांच्या निवडणुकांना यातून वगळल्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असून कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रथम दि.१८ मार्च २०२० रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यानंतर वेळोवेळी यात वाढ करत आतापर्यंत सहा वेळा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर शेवटचा आदेश दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी काढून दि.३१ मार्च २०२१ पर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती.
दि.३१ मार्च २०२१ पर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली मुदत संपल्यामुळे राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी आज दि.०६ एप्रिल २०२१ रोजी या निवडणुकांना दि.३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती दिल्याचा आदेश काढला. त्यामुळे सहकारी संस्थाच्या निवडणूकांची ज्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू आहे, त्या टप्प्यावर या प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.