वीर धरणामधून नीरा नदीत कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाणार.

नीरा व भीमा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा.
टिम: विजयदिप न्यूज.
वीर धरणाच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत असून धरण आज सायंकाळ पर्यंत ९० टक्याच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तासात कोणत्याही क्षणी धरणाच्या सांडव्यामधून नीरा नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याची अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांनी दिली. तसेच प्रशासनाकडून नीरा व भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.
नीरा उजवा कालवा विभाग, फलटण कडून काढण्यात आलेल्या पत्रात वीर धरणाची पाणी पातळी १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता ८२.५६ टक्के एवढी झाली असून उपयुक्त पाणीसाठा ७.७६ टीएमसी झाला आहे. तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असून धरणाच्या पाणीसाठयामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणामधून नीरा नदीमध्ये पुढील २४ तासात कोणत्याही क्षणी विसर्ग सुटण्याची शक्यता आहे. तरी नदी काठाच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत किंवा वित्तहानी होणार नाही अशा स्वरूपाची माहिती देऊन जिल्हाधिकारी पुणे, सातारा, सोलापूर तसेच तहसिलदार खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, पुरंदर, बारामती व इंदापूर यांना कळविण्यात आली आहे.
नीरा खोर्यातील भाटघर, निरा देवघर, गुंजवणी व वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत असून या चार धरणात २४ तासात ३ टीएमसी पाणीसाठा वाढला असून एकूण पाणीसाठा २३.७६ टीएमसी तर सर्व धरणामधील एकूण सरासरी टक्केवारी ४९.१७ टक्के एवढी झालेली आहे.
गत वर्षी नीरा खोर्यातील सर्व धरणात मिळून १४ जुलै २०२१ रोजी १३.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. त्या तुलनेत यावर्षी १४ जुलै २०२२ रोजी २३.७६ टीएमसी एवढा पाणीसाठा असून तो मागील वर्षाच्या तुलनेत १०.५१ टीएमसी एवढा जास्त आहे.
