द्राक्ष पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने होवून शासनाकडून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी- चेअरमन कल्याणराव काळे

टिम:विजयदिप न्यूज.
पंढरपूर तालुक्यात आवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने होवून शासनाकडून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी केली.
पंढरपूर तालुक्यात द्राक्ष पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून तालुक्यातून द्राक्ष निर्यातही मोठया प्रमाणात होत असते. द्राक्ष पिक फेब्रुवारी ते मे महिना अखेर काढले जात असते मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे वर्षभर जोपसलेली द्राक्ष पिक वाया गेल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. तसेच बागेस केलेल्या खर्चापेक्षाही द्राक्षास भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी झालेला आहे. त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी किंवा सावरण्यासाठी शासनाकडून भरीव मदत मिळावी अशी मागणी चेअरमन कल्याणराव काळे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी देवडे, सुपली, सिध्देवाडी इ.गावाच्या विविध विकास कामांची निवेदने देण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सहकार शिरोमणीचे संचालक तानाजी जाधव उपस्थित होते.