‘पांडुरंग सहकारी’ची गाळप क्षमता वाढविण्याचे नियोजन- आ.प्रशांत परिचारक.

‘पांडुरंग सहकारी’कडून ऐतिहासिक १२ लाख ५१ हजार मे.टन ऊसाचे विक्रमी गाळप.
टिम: विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग साखर कारखान्याचे विस्तारीकरण करून कारखान्याची गाळप क्षमता २०२३ च्या हंगामापर्यंत प्रति दिन १० हजार मे.टना पर्यंत करणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक यांनी केली. ते ‘पांडुरंग ‘ चा यंदाचा गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना आ.परिचारक म्हणाले की, कारखान्याच्या इतिहासात प्रथमच गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये विक्रमी असे १२ लाख ५१ हजार मे.टन ऊस गाळप झाले असून या गळीत हंगामात शेवटच्या पंधरा दिवसात गाळपासाठी खूप त्रास झाला. तोडणी व्यवस्था विस्कळीत झाल्याने सर्वच कारखान्याच्या बाबतीत ही परिस्थिती उद्भवली. पांडुरंग कारखान्याने उशिरा येणाऱ्या उसाला शंभर रुपये पर्यंत जास्तीचा दर दिला आहे. त्याशिवाय ऊस तोडणी व वाहतूकदारांना देखील रक्कम वाढवून दिली आहे. यामुळे कारखान्याला अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागला. तसेच साखर कारखान्याने किती गाळप केले यापेक्षा ऊस उत्पादकांना दर किती दिला यावर त्या कारखान्याचे यश ठरवले जात असल्याचे आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
गाळप करताना साखर उताराही महत्त्वाचा मानला जातो. पांडुरंग कारखान्याने पुणे विभागात चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवल्याचे आ.परिचारक यांनी आवर्जून सांगितले. उसाखालील वाढते क्षेत्र आणि गाळपास होणारा विलंब याचा विचार करून पांडुरंग कारखाना आपली गाळप क्षमता १० हजार टनापर्यंत नेण्यासाठी निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पांडुरंग कारखान्याची कर्ज काढण्याची क्षमता चारशे कोटींची आहे. परंतु आम्ही तेवढे कर्ज काढणार नाही. पांडुरंग बरोबर इटोपियन कारखान्याच्या विस्ताराचा देखील विचार आहे. कोणत्या साखर कारखान्याला ऊस द्यायचा आहे. हे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधी ठरवावे असे आव्हान देखील आ.प्रशांत परिचारक यांनी केले. केंद्र सरकारने इथेनॉल व साखर निर्याती संदर्भात पोषक धोरण ठेवल्याने साखर कारखानदारी यंदा कशी-बशी तगली आहे. असेही ते म्हणाले. कारखान्याच्या कामगारांना त्यांनी एक महिन्याचा पगार बक्षीस म्हणून दिला.
कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास इटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक, माजी चेअरमन दिनकर मोरे, दाजी पाटील, दिलीप चव्हाण, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्व संचालक खातेप्रमुख व ऊस उत्पादक आणि तोडणी कामगार उपस्थित होते. डॉ.सुधीर पोफळे यांनी सूत्र संचालन केले.
‘पांडुरंग सहकारी’ने १२ लाख ५१ हजार मे.टन गाळपाचे ऐतिहासिक उद्दिष्ट पूर्ण केले, तसेच जिल्ह्यात सर्वात जास्त साखर उताऱ्याची परंपरा यंदा देखील कायम असून पुढील वर्षी देखील यापेक्षा जास्त गाळप होईल असा विश्वास आहे. यंदा झालेला विलंब व पुढील हंगाम लवकर सुरू करायचा असल्याने कारखान्याचा बंद कालावधी ७० ते ८० दिवसाचा राहील. त्यामुळे पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी खूप कमी वेळ आहे. कारखान्याच्या आसावनी प्रकल्पात थोडेसे बदल करून त्याची क्षमता एक लाख लिटर पर्यंत नेली जाईल.
डॉ.यशवंत कुलकर्णी,
कार्यकारी संचालक.
‘पांडुरंग’च्या यंदाच्या हंगामाची वैशिष्टे
एकूण गाळप | १२ लाख ५१ हजार मे.टन. |
साखर उत्पादन | १४ लाख १९ हजार क्विंटल |
साखर उतारा (बी –हेवीसह) | ११. ६० |
सहवीज निर्मिती | ८ कोटी १८ लाख युनिट |
डिस्टलरी प्रकल्पातील उत्पादन | ८६ लाख लिटर |