इतर

उजनी उजवा कालव्यास मागणी अभावी पाणी सोडण्यास विलंब.

केवळ १२० हेक्टरचे मागणी अर्ज.

टिम: विजयदिप न्यूज.

उजनीच्या मुख्य कालव्यात २८ जानेवारी पासून रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्यात आले असले तरीदेखील उजनी उजवा कालवा लाभक्षेत्रात मागणी अर्ज अत्यल्प आल्यामुळे पाणी सोडण्यास विलंब होताना दिसत आहे. यामुळे रब्बीचे आवर्तन सुरू होण्यासाठी उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी मागणी अर्ज करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंढरपूर विभागात श्रीपूर उपविभागामधून फक्त १२० हेक्टर क्षेत्राला पाणी मागणी अर्ज प्राप्त झाले असून अद्यापही पंढरपूर व मंगळवेढा भागातून मागणी आलेली नाही. त्यामुळे उजव्या कालव्यास आवर्तनात सुटण्यास कांही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील तसेच माण नदीवरती मोठ्या प्रमाणात क्षेत्र उजनी उजवा कालवा लाभक्षेत्राखाली ओलीताखाली आलेले आहे. त्याचप्रमाणे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना उजनीच्या पाण्यावरतीच अवलंबून राहावे लागते. असे असले तरी मागील कांही वर्षापासून उजनी उजवा कालवा लाभक्षेत्रात म्हणावे तसे पाणी मागणी अर्ज येताना दिसत नाहीत. त्यामुळे दिवसेंन-दिवस उजनी उजवा कालव्याचा आवर्तन कालावधी कमी होत चाललेला असून लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

प्रत्यक्षात विचार केला तर उजनी उजवा कालवा लाभक्षेत्रातील कालव्याच्या खालील भागातील शेतकर्‍यांचे जीवन कालव्याच्या पाण्यावरती अवलंबून आहे. कालव्याचे आवर्तन सुटण्यास विलंब झाला तर लाभक्षेत्रातील विहरी तळ गाठतात तर बोरवेल अखेरची घटका मोजतात व पिके माना टाकतात असे असूनही पाणी मागणी होताना दिसत नाही.

प्रत्यक्षात शेतकरी सिंचनासाठी पाणी वापर करतात परंतु त्याचे रूपांतर पाणी मागणी अर्जात का होत नाही. याचा सुध्दा पाटबंधारे विभागाने गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. व शेतकर्‍यांनी ही नियमांनुसार पाणी मागणी अर्ज करणे गरजेचे आहे. अन्यथा कालव्याचे पाणी कमी होण्यास जास्तीच्या कालावधीची वाट पहावी लागणार नाही. जर कालव्याचे पाणी कमी होऊन इतरत्र गेले तर पुन्हा वाईट वाटून घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही.

पाणी सोडण्यासाठी पाणी मागणी अर्ज येणे आवश्यक आहे. मागणी अर्जबाबत उपविभागांचा आढावा घेण्यात आला असून भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर या विभागात श्रीपूर उपविभागा मधून केवळ १२० हेक्टर क्षेत्राची मागणी आलेली आहे. तर पंढरपूर व मंगळवेढा मधून मागणी आलेली नाही. जशी मागणी येईल त्याप्रमाणे विचार करून कालव्यास पाणी सोडण्यात येईल. मागणी आली तर येत्या ४ ते ५ दिवसात पाणी सोडण्याचा विचार केला जाईल.

सोमशेखर हरसुले, कार्यकारी अभियंता,

भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!