‘पांडुरंग’चा गळीत हंगाम शुभारंभ रविवारी; कारखाना पूर्ण क्षमतेने गाळपासाठी सज्ज.- डॉ.यशवंतराव कुलकर्णी.

विविध राजकीय पक्षाचे आमदार राहणार उपस्थित.
टीम विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२१-२२ च्या गाळपासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज झाला असून, उद्या रविवार १७ ऑक्टोबर रोजी स.११ वाजता कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंतराव कुलकर्णी यांनी दिली.

कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषद आ.रणजितसिंह मोहित-पाटील, सांगोल्याचे शिवसेनेचे आ.शहाजीबापू पाटील, आ.राजाभाऊ राऊत, आ.सचिन कल्याणशेट्टी, पंढपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आ.समाधान आवताडे, माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आ.राम सातपुते यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात येणार आहे.
पांडुरंग सहकारीचा नावलौकिक सर्वत्र असून कारखाना व्यवस्थापनाच्या नियोजनबध्द कारभारमुळे कारखाना आर्थिक सक्षम आहे. तसेच कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ च्या गाळप केलेल्या ऊसाची संपूर्ण एफआरपी शेतकर्यांना दिली असून कारखान्याने कारखान्याच्या कामगारांना दीपावलीच्या सणानिमित्त जिल्ह्यात सर्वात जास्त १८ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवसाला ९ हजार मे.टन ऊस पुरवठा करू शकेल एवढी यंत्रणा.
उद्या सुरू होणार्या गळीत हंगाम २०२१-२२ साठी जवळपास १६ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे आव्हान कारखान्यापुढे असून या वर्षीच्या हंगामात कारखान्याने दिवसाला ९ हजार टन ऊस कारखान्याला पुरवठा करू शकेल एवढी यंत्रणा उभी केली आहे. ही यंत्रणा गाळपासाठी सज्ज झाली आहे.