महाराष्ट्र

गोर-गरिबांचा कैवारी आ.भारतनाना भालके यांचे निधन.

लाल मातीतला आणि राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील एक झंझावात अखेर शांत झाला.

विजयदीप न्यूज.

            लाल मातीतला आणि राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील एक झंझावात दि.२७ नोव्हेंबर रोजी अखेर शांत झाला. झुंझार आणि गोर-गरिबांचा कैवारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ.भारत भालके यांची जीवन-मृत्यूशी सुरू असलेली लढाई अखेर संपली.

            त्यांच्यावरती पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आ.भालके यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एका संघर्षाची अखेर झाली असून संपूर्ण पंढरपूर तालुका शोकसागरात बुडाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील आ.भालके समर्थक हजारो नागरिकांनाही अनावर दुःख झाले आहे. 

      ऑक्टोबर महिन्यात आ.भालके यांना कोरोना ची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले. मात्र नंतर त्यांना किडनीविकार आणि, डेंग्यू या आजाराने  ग्रासले. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात रुबी हॉल येथे उपचार सुरू होते. मात्र वरचेवर त्यांची प्रकृती खालावत गेली. दोन दिवसांपासून त्यांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले तरीही त्यांच्या प्रकृतीने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. गुरुवारी सायंकाळपासून त्यांची तब्येत खालावत गेली. शुक्रवारी दुपारपर्यंत प्रकृती जैसे थे होती. अखेरीस रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

      २००९ पासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेले आ.भालके यांची राजकीय कारकीर्द श्री.विठ्ठल सहकारी साखर करखाण्याच्या संचालक पदापासून सुरू झाली. लहानपणापासून लाल मातीची ओढ असलेल्या भालके यांनी कुस्त्यांचे मैदान गाजवले तसेच राजकीय मैदानात भल्या भल्या राजकीय आसामिना अस्मान दाखवले. २००४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. मात्र २००९ साली अपक्ष उभे राहून भालके विजयी झाले. त्यानंतर २०१४ साली काँग्रेस कडून तर २०१९ साली विधानसभेची हॅट्ट्रिक करताना राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या तिकीटावरती निवडून आले.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ.भारत भालके यांचे निधन झाले असून त्यांच्यावरती दु.४ वा. सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस चे अध्यक्ष मा.शरद पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

            तळागाळातील लोकांशी असलेला थेट संपर्क, लोकांच्या सुख दुःखात सामील होण्याचा त्यांचा स्वभावगुण त्यांच्या लोकप्रियतेचे गमक होय. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सत्तेत आणि सत्तेच्या बाहेर राहूनही संघर्ष केला. पंढरपूर शहर, तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले, तसेच मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजना, पिण्याच्या पाण्याची योजना, संत, महंतांची स्मारके, अनेक गावचे रस्ते, पिण्याच्या पाणी पुरवठा योजना त्यांनी मार्गी लावल्या. सर्व सामान्यांसाठी प्रसंगी कायदा हातात घेण्यासही ते कधी घाबरले नाहीत. म्हणूनच २०१४ च्या मोदी लाटेत, पंढरीत नरेंद्र मोदींची सभा होऊन ही आ.भालके विजयी झाले होते. अबाल वृद्धांचे, युवकांचे आणि माय बहिणींचा  ‘नाना’  आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाची जेमतेम ६० वर्षे पूर्ण करीत असताना भालके यांनी समाज मनावर वेगळीच छाप सोडली असून त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रचंड संघर्ष वाट्याला आला आणि अखेरीपर्यंत ते सर्व आघाड्यावर संघर्ष करीत राहिले. राज्याच्या विधानसभेत केवळ ११ वर्षात धडाडीचे लोकप्रतिनिधी म्हणून आ.भालके यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्याने एक झुंजार राजकारणी गमावला आहे तर पंढरपूर, मंगळवेढ्याच्या जनतेने आपला लाडका ‘नाना’ गमावला आहे. आ.भालके यांच्या निधनाने पंढरपूर, मंगळवेढा हे दोन्ही तालुके राजकीय दृष्टीने पोरके झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!