महाराष्ट्र

उजनीच्या पाण्यासाठी आजपासून जिल्हाभर उद्रेक पहायला मिळेल- अतुल खुपसे-पाटील.

राज्य सरकार सोलापुरकरांचा अंत पाहत आहे.

टीम विजयदिप न्यूज.

‘सांडपाणी’ या शब्दाची झालर देऊन सोलापूर करांच्या हक्काचे उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘दिशाभूल’ करून बारामतीकरांनी पळविले. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक पाहता व सोलापुर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उरले-सुरले अस्तित्व टिकवण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पिलावळासोबत २२ एप्रिल चा ‘तो’ आदेश रद्द केल्याचा व्हिडिओ प्रसारित केला. मात्र आज तो व्हिडिओ व्हायरल करून पाच दिवस उलटून गेले तरी याबाबत कुठलाच शासकीय अध्यादेश निघाला नाही व पुन्हा एकदा सोलापूरकरांची ‘दिशाभूल’ केली आहे त्यामुळे उजनीच्या ५ टीएमसी पाण्यासाठी आजपासून जिल्हाभर उद्रेक पाहायला मिळेल असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर, दिपक भोसले, दिपक वाडदेकर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष बापु मेटकरी, सहसचिव किरण भांगे, संघटक माऊली जवळेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, सिद्धाराम पाटील, सुदर्शन पाटील, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, रुक्मिणी दोलतडे, बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खुपसे-पाटील म्हणाले की, उजनी धरणाची निर्मिती मुळातच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. या उजनी धरणावर इतर तालुक्याचा अथवा जिल्ह्याचा कोणताच अधिकार नाही हे माहिती असताना देखील केवळ कागदावरच्या नियोजनावर पाणी पळविण्याचा घाट बारामतीकरांनी बांधला आहे. पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांच्यावर आमचा अजिबात रोष नाही, त्यांना आम्ही कधी एका शब्दाने देखील दुखावले नाही. मात्र आमचं पाणी पळणारा कोणी का असेना तो कोणत्याही माईचा लाल असेना, आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. मात्र आम्ही आमचं पाणी कोण नेणार असेल तर आम्ही शेतकरी म्हणून सुट्टी देणार नाही. त्यासाठी भलेही पाण्याचा रंग लाल झाला तर बेहत्तर आम्ही कशाचीच पर्वा करणार नाही.  

मुख्यमंत्री यांची दिशाभूल करून सांडपाणी हा शब्द वापरून विनाकारण सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचे पाप बारामतीकरांनी केलेले आहे. येणाऱ्या काळात त्यांना याचे परिणाम भोगावे लागतीलच असे सांगून जोपर्यंत ‘रद्द’ च्या आदेशाबाबत शासकीय अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे सांगून आजपासून ५ टीएमसी पाण्यासाठी जिल्हाभर उद्रेक होईल अशा शब्दात अतुल खूपसे-पाटील यांनी शासन आणि प्रशासनाला इशारा दिला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!