येणारे पंधरा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे व मौल्यवान- डॉ.रामचंद्र मोहिते.

टीम विजयदीप न्यूज.
माळशिरस तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत चाललेले असून येणारे पंधरा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे व मौल्यवान आहेत असे मत माळशिरस तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते यांनी व्यक्त केले असून त्यांनी माळशिरस तालुक्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
डॉ.रामचंद्र मोहिते यांचे जनतेला केलेल्या आवाहनाची पोस्ट.
सर्व सन्माननीय नमस्कार, गेल्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपण सर्व कोरोनाशी एकत्र लढत आहोत. आम्ही केलेल्या सूचना आपण तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल आपला आभारी आहे. सध्याच्या परिस्थितीतही आमच्या यंत्रणा काम करत आहेत आणि करत राहतील.
आपले सर्व प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही, याचे नक्कीच मनामध्ये दुःख पण आहे. आपण सर्वत्र पहातच आहोत की, सध्या कोविड -१९ रुग्णांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक रुग्ण अचानक सिरीयस होत आहेत आणि काही लोकांचे दुर्दैव मृत्यू होत आहे. त्या परिस्थितीमध्ये ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर अनेक प्रकारची औषधे यावर फार मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे व ही सुख सुविधा मिळणे जिकरीचे झाले आहे. या काळात जर आपल्याला कोविड-१९ इन्फेक्शन झाले तर हाताळणे अतिशय अवघड होत आहे.
काही नागरिकांचा असा समज आहे कि, कोविड अनेक जणांना झालेला आहे आणि तो बरा पण झालेला आहे. त्यामुळे काही होऊ शकत नाही. परंतु या वेळची परिस्थिती वेगळी आहे हे सर्वांनी मनावर बिंबवून घेतले पाहिजे. प्रशासनातील तसेच आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या अनेक व्यक्ती पॉझिटिव येत आहेत. यामुळे आपण येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची व नागरिकांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र सुखसुविधा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या काही काळाने वाढतील पण. पण गेलेली वेळ काही परत येणार नाही.
आपण अशी आशा करू शकतो की येत्या काही कालावधीमध्ये ही परिस्थिती लवकरच निवळू शकेल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता हे आपल्या जिवनातील अतिशय महत्वाचे १५ दिवस असून या कालावधीमध्ये घराच्या बाहेर न पडता मास्कचा वापर, सॅनीटायझरचा वापर, स्वच्छतेचे सर्व नियम, सोशल डिस्टन्स व इतर सर्व खबरदारी महत्त्वाची आहे. यासाठी ५० वर्षांवरील सर्व, जुने आजार असलेले लोक तसेच लहान मुले यांची काळजी घेणे ही फार महत्वाचे आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर जरी कोविड झाला तर ते हाताळणे सोपे असते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय जिकरीचे झालेले आहे.
सर्व यंत्रणावर व आरोग्य सुविधावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती काही दिवसांनी सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःच्या जिवाची काळजी स्वतः घेणे व स्वतः सर्व नियम पाळून सुरक्षित राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
या पोस्ट मुळे आपल्या मनात भीती निर्माण करून घेऊ नये. माझा उद्देश एवढाच आहे की आपण परिस्थितीचे गांभीर्य समजून वागावे ही नम्र विनंती.
डॉ.रामचंद्र मोहिते,
तालुका आरोग्य अधिकारी माळशिरस.
आरोग्य विभाग,पंचायत समिती, माळशिरस.