संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग बाधितांना मोबदला वाटप अंतिम टप्प्यात.- शमा पवार.

टीम विजयदिप न्यूज.
श्री.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५(ग) साठी अधिग्रहीत केलेल्या मालमत्तांचा मोबदला देण्यासाठी आजतागायत १८७ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर महाळुंग येथील यमाई देवीच्या मंदिराजवळील बाह्यवळण व माळीनगर येथील उड्डाणपुलाचे प्रश्नही मार्गी लागले आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी, तथा भूसंपादन अधिकारी शमा पवार यांनी दिली.
श्री.संत तुकोबांच्या पालखी महामार्गावरील महाळुंग, बोरगाव आणि माळखांबी येथील विवादित मुद्द्यांच्या न्यायनिवाड्यासाठी उपविभागीय अधिकारी, शमा पवार यांनी महाळुंग येथे काल गुरुवार दि.२५ रोजी बैठक घेतली. या बैठकीत पालखी मार्गावरील बाधित नागरिकांच्या शंकांचे निरसन करून त्यावर तोडग्याचे योग्य ते निर्देश देण्यात आले. या बैठकीला मंडल अधिकारी चंद्रकांत भोसले, तलाठी सिद्धेश्वर भोसले, संभाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शमा पवार म्हणाल्या की, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी अकलूज विभागाला १८७ कोटींचा निधी दोन टप्प्यांमध्ये उपलब्ध झाला असून नागरिकांना मोबदला देण्याचे काम बऱ्यापैकी उरकत आले आहे. राहिलेल्यांना मोबदला देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाळुंग येथे पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या यमाई देवीच्या मंदिरामागून हा महामार्ग गेला आहे. मंदिरापासून १०० मीटरच्या आत कसलेही बांधकाम करायचे नाही असा नियम होता. यासंदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका होऊन तोडगा निघाला असल्याचे उपविभागीय अधिकारी, शमा पवार यांनी सांगितले. माळीनगर येथील नागरिकांच्या सोयीप्रमाणे येथील बंदिस्त उड्डाणपूल आत दुरुस्त्या करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
बायपास मोजणी शनिवारी.
महाळुंग च्या मंदिराजवळील बायपाससाठी शनिवार दि.२७ रोजी मोजणी होणार आहे. तोपर्यंत येथील २३ गटांमधील मोबदला प्रलंबित ठेवला आहे. या मोजणीचा नकाशा आपल्यापर्यंत आल्यानंतर पुढील पंधरा दिवसात येथील मोबदला देण्याचे काम मार्गी लागेल असे उपविभागीय अधिकारी, शमा पवार यांनी सांगितले. सध्या भूसंपादनामध्ये ज्या गटांचा समावेश आहे त्यातील काही गट वगळले जाण्याची व काही नव्याने समाविष्ट होण्याची शक्यता त्यांनी सांगितली.
मोबदल्यासाठी नागरिकांनी थेट महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा.
भूसंपादन व इतर मालमत्तांच्या मोबदल्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. मोबदला मिळवून देण्यासंदर्भात नागरिकांची दिशाभूल होत असलेल्या तक्रारी आहेत. मोबदल्यासाठी नागरिकांनी थेट महसूल प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी, शमा पवार यांनी केले. शासकीय निकषांनुसार सर्वांना मोबदला मिळणार आहे. यामध्ये थोडे पुढे मागे झाल्यास गोंधळून जाऊ नये. कोणीही वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी दिला.