कृषीपंपासाठी उच्च दाबाने वीज पुरवठा करा; अन्यथा आंदोलन करु.- भाजपाचे अमरसिंह माने-देशमुख.

टीम विजयदिप न्यूज.
महावितरण कडून कृषीपंपासाठी केला जाणारा विद्युत पुरवठा पुरेशा दाबाने केला जात नाही. तातडीने कृषीपंपांसाठी केला जाणार विद्युत पुरवठा उच्च दाबाने करावा अन्यथा महावितरण विरुध्द आंदोलन करण्याचा इशारा माळशिरसचे भाजपा उपाध्यक्ष अमरसिंह माने-देशमुख यांनी दिला आहे.
सदया उन्हाचा तडाखा वाढू लागलेला आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शेतात उभी असलेली नगदी पिके, भाजीपाला व फळबागांसाठी जादा पाण्याची गरज भासू लागलेली असून शेतकर्याला आपली पिके वाचविण्याची गरज असून त्यासाठी लागणारा विद्युत पुरवठा हा कमी दाबाने केला जात आहे. त्यामुळे कृषीपंप चालत नाहीत. त्यासाठी पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी माने देशमुख यांनी केली आहे .
मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला . भाजीपाल्यासह, द्राक्ष, केळी, डाळींब, कलिंगड, आंबा आदी फळे कवडीमोल दराने विकावी लागली तर हजारो शेतकऱ्यांना ही फळे रस्त्यावर फेकावी लागली. त्यात शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. त्यानंतर खरीपात अतिवृष्टी झाली. संपूर्ण खरीप हंगामात कोणतेही पिक घेता आले नाही. अतिवृष्टीमुळे शेतात तण वाढले, रान वाहून गेली, तण काढून बांधबंदीस्ती करुन शेती नीट केली व त्यानंतर रब्बी हंगामातील पिके घेतली. सध्या शेतात उस, गहू, मका, रब्बी ज्वारीसह चारा पिके, फळबागा व भाजीपाल्याची पिके उभी आहेत. यंदा मुबलक पाऊस झाल्याने विहीरी व विंधन विहीरीला बऱ्यापैकी पाणी आहे. नीरा उजवा कालवा बंद झाल्याने आता पिकांना विहीरी व विंधन विहीरीतून पाणी द्यावे लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. जनावरांना विहीरीतून पिण्यासाठी पाणी काढून देणे अशक्य आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांनी कृषीपंपांसाठी दिवसा वीज देण्याची घोषणा करुन अजून चार दिवसही झाले नाही तर इकडे दिवसा सोडा रात्रीसुध्दा पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा केला जात नाही. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने राहोत्री व कृषीपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाचाही विद्युत पुरवठा खंडित करु नका म्हणून सांगतात तर दुसरीकडे वीज बिल भरल्याशिवाय राहोत्री दुरुस्त करणार नाही म्हणून अधिकारी सांगतात. अधिकारी व मंत्र्यांच्या मध्ये शेतकरी मात्र भरडला जात आहे. महावितरण विभागाने पुरेशा उच्च दाबाने विज पुरवठा करावा अन्यथा महावितरण विरुध्द आंदोलन करु असा इशारा माने देशमुख यांनी दिला आहे.