बोरगाव-वेळापूर रस्त्याच्या कामाची चौकशी करा – राहुल बिडवे

टीम विजयदीप न्यूज.
माळशिरस तालुक्यातील बोरगाव ते वेळापूर रस्त्याचे काम गेली दोन वर्षापासून संथ गतीने चालू असून सदर कामाचे पैसे हे ठेकेदाराला मिळाले आहेत. रस्त्याचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे सदर कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी, अकलूज याच्याकडे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे यांनी दिले आहे. तसेच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी रयतचे युवानेते रणजित चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बाजीनाना सरगर, राजकुमार बिडवे, राजकुमार देशमुख, वैभव कोरे उपस्थित होते.
या रस्त्याचे खडीकरण न करता थेट डांबरीकरण केले बोरगाव पासून तीन किलोमीटर रस्ता केलाच नाही उर्वरित रस्ता हा आतापासूनच खराब झाला असून नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर कामामध्ये बांधकाम विभाग अकलूज मधील अधिकारी सामिल असल्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करण्यात आला असून तीन किलोमीटर रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण केलेच नाही. सदर कामाचे पहाणी करून तातडीने चौकशी करण्यात यावी. राहिलेल्या रस्त्याचे काम लवकरात-लवकर करण्यात यावे अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल बिडवे यांनी दिला.