माझ्या शेतकर्यांच्या शेतात समृद्धि नांदू दे. – उपमुख्यमंत्री अजित पवार.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री.विठ्ठलाच्या चरणी साकडे.

विजयदिप न्यूज.
राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख हलकं करण्याची ताकद महाविकास आघाडीच्या शासनाला दे, शेतकर्यांच्या शेतात समृद्धि नांदू दे. तसेच कोरोना विषाणूवरील लस लवकरच येऊ दे आणि अवघे जग पूर्ण कोरोना मुक्त होऊ दे असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ.सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल-रुक्मिणी ची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात आली त्यानंतर श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.अजित पवार व सौ.सुनेत्रा पवार यांचा श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ.सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडुजी भोयर, सौ.कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ.साधना भोसले, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.
पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. तसेच गेले कांही दिवस कोरोना आटोक्यात आला असे चित्र होते. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबत समस्त वारकरी बांधवाचे आभार मानतो कारण त्यांनी शासनाच्या आव्हानाला आषाढी यात्रे प्रमाणेच कार्तिकी यात्रेस प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील असा विश्वास त्यांनी व्यत केला.
श्री.विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकां प्रमाणे माझी ही श्रद्धा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपल्या सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आधी गोष्टी काटेकोरपणे अमलात आणाव्या लागतील.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहीद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे असे ते म्हणाले. याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री.कवडुजी नारायण भोयर आणि सौ.कुसुमबाई कडूजी भोयर (मु.डौलापूर,पो.मोझरी, तालुका-हिंगणघाट, जिल्हा-वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला. तसेच श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या दैनंदिनी २०२१ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे दत्तात्रय चिकोर्डे, सुधीर सुतार आदी उपस्थित होते.