विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे १७६ रुपये प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.

१० ऑक्टोबरला विठ्ठलराव शिंदे १ व करकंब युनिट २ येथे ऊस- मोळी व गव्हाण पूजन होणार.
दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना १५ दिवसाचा पगार व ८.३३ टक्के बोनस जाहीर.
बेंबळे / मुकुंद रामदासी.
मागील २०२०-२१ गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन १७६ रुपये प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून एफआरपी प्रमाणे २ हजार ३७६ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना पोहोचले आहेत. एफआरपी प्रमाणे संपूर्ण रक्कम शेतकर्यांना देणारा विठ्ठलराव शिंदे युनिट १ व युनिट २ जिल्ह्यात अव्वल ठरले आहेत. याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त पंधरा दिवसाचा पगार व ८.३३ टक्के बोनस देणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनदादा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
दरम्यान २०२१-२२ चा गळीत हंगाम रविवार दि.१० ऑक्टोबर रोजी साध्या पद्धतीने ऊसमोळी व गव्हाण पूजन करून साजरा होणार आहे. विठ्ठलराव शिंदे १ चे सकाळी १० वाजता तर करकंब युनिट २ चे सायं.४ वाजता पूजन होणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे १५ ऑक्टोबर पासून दोन्ही युनिटचे रितसर गाळप सुरू होणार आहे. याचबरोबर विठ्ठलराव शिंदे युनिट १ व २ च्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १५ दिवसाचा पगार व ८.३३ टक्के बोनस देणार असल्याचेही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनदादा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
अधिक माहिती देताना आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, चालू गळीत हंगामात विठ्ठलराव शिंदे युनिट १ पिंपळनेर या मधून २० लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दीष्ट असून करकंब येथील युनिट २ मध्ये ५ लाख मेट्रिक टन असे एकूण २५ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच विठ्ठलराव शिंदे युनिट १ व २ मधून एकूण १३ कोटी युनिट वीज निर्मिती तर दोन्ही युनिट मधून ४ कोटी ५० लाख लिटर इथेनॉल निर्मिती करण्याचा उद्देश आहे. मागील २०२०-२१ हंगामात दोन्ही युनिटमधून १८ लाख ७५ हजार ३८२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते व आज एफआरपीप्रमाणे याचे संपूर्ण बिल अदा केले आहे. एकूण ४४८ कोटी १४ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचेही आ.बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
साखर वाटप
प्रतिवर्षीप्रमाणे कारखान्याचे सभासद व ऊस पुरवठादार यांना दिवाळीनिमित्त ५० किलो साखरेची गोणी घरपोच देण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे. ज्यांचा ऊस गळीतास आलेला आहे त्यांना उधारीत व ऊस नसेल त्यांना १ हजार ४५० रुपये प्रति ५० किलो याप्रमाणे साखर देण्यात येत आहे.
ऊस तोडणी युनिट १ व २ वाहतुकीसाठी सर्व अॅडव्हान्स पेमेंट दिले गेले आहे. तसेच वाढीव डिझेल दराचा फरक देण्याचा संचालकांचा मानस आहे. कारखान्याचे वजन काट्या विषयी आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींच्या बरोबर वारंवार या कारखान्याचे उसाचे वजन काटे तपासण्यात आले आहेत. तसेच भरारी पथकाच्या मार्फत वजन काट्याची तपासणी करण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारचा दोष आढळलेला नसून वजन काटे योग्य असल्याचा अभिप्राय दिलेला आहे. त्यामुळे कोणीही फुकट बदनामी करू नये किंवा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असेही आ.बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
कृषीभूषण संजीव माने व सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रयोग.
ऊस विकास योजनेअंतर्गत कारखाना शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रति टन प्रमाणे कंपोस्ट खत शेतात नेऊन पोहोच करत आहे, तसेच ठिबक सिंचन, मातीपरीक्षण यासाठीही वेळोवेळी सहकार्य केले जात आहे. ऊस विकास तज्ञ कृषीभूषण संजीव माने व सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रामधील ८४ शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ऊस उत्पादनावर नवीन प्रयोग करण्यात येत असून जास्तीत-जास्त टनेज वाढावे व रिकव्हरी पण चांगली मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. को ८६०३२, को १०००१, को ८००५ या उसाच्या जातीच्या साठी कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहकार्य करत आहे.
या शिवाय शेतकऱ्यांना चिकू, आंबा, नारळ आदी फळांच्या रोपांचे वाटप केले जाते. तसेच रक्तदान शिबिर, कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलिंडर देणगी इत्यादी सामाजिक उपक्रमाबाबत कारखाना सदैव तत्पर असतो असे आ.बबनदादा शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.
पुढील हंगामासाठी एफआरपी प्रमाणे दर देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत व इतर सर्व कारखान्यांच्या पेक्षा अधिक चांगल्या प्रकारचे ऊसाचे पहिले बिल आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना निश्चित दिली जाईल असेही आ.बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी जनरल मॅनेजर सुहास यादव, कारखान्याचे कार्यकारी संचालक डिग्रजे, मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे तसेच इतर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.