टिपरच्या धडकेत वाखरीत एकाचा जागीच मृत्यु.

ठेकेदार कंपनीची वाहने चालू देणार नाही. वाखरी ग्रामस्थांनी दिला इशारा.
विजयदिप न्यूज.
राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ चे काम सुरु असुन या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावरती मुरुमाची व इतर साहित्याची वाहतुक करण्यात येत आहे. परंतु वाहतुकीचे कोणतेही निमय पाळले जात नाहीत.
आज रस्त्याच्या मुरूम कामासाठी वाहतूक करणाऱ्या बेफाम टिपरने वाखरी ( ता.पंढरपूर) येथे भागवत निवृत्ती नागणे ( वय ६५ वर्षे ) यांना चेंगरल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. दरम्यान या बेफाम आणि बेशिस्त वाहतुकीबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीला शिस्त लावली गेली नाहीतर ठेकेदार कंपनीची वाहने चालू देणार नाही. असा इशारा वाखरी ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाखरी येथील भागवत निवृत्ती नागणे ( वय ६५ वर्षे ) हे दूध घालण्यासाठी मोटारसायकल वरून जात असताना वाखरी आश्रम शाळेजवळ पाठीमागून बेफाम वेगाने आलेल्या एस. एस. अवताडे कंपनीच्या टिपरने उडवले. टिपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार सायकलस्वारास चेंगरून टिपर रस्त्याच्या खाली गेला. अपघात होताच टिपर चालक पळून गेला आहे. भागवत नागणे यांना उपचारासाठी दवाखान्यात आणले असताना मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान वाखरी ते खुडूस या दरम्यान पालखी महामार्गाचे काम सुरू असून या मार्गावर वाहतुकीला कसलीही शिस्त नाही. अरुंद रस्त्यावरून बेशिस्त आणि बेफाम वाहतूक चालत असल्याने दुचाकीस्वारासह छोट्या वाहनांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ता मार्गावरील जड वाहतूक काम पूर्ण होईपर्यंत अन्य मार्गे वळवण्यात यावी, वाहनांच्या वेगाला मर्यादा हवी अन्यथा वाहतूक बंद पाडू असा इशारा वाखरी ग्रामस्थांनी दिला आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहे.