इतर

‘पांडुरंग सहकारी’चे ऊस उत्पादकांच्या विश्वासामुळे उच्चांकी गाळप- आ. प्रशांत परिचारक.

‘पांडुरंग सहकारी’चे उच्चांकी १२ लाख मे. टन गाळप, तर विक्रमी १३ लाख ७५ हजार ५५५ साखर पोत्याचे पूजन

टिम: विजयदिप न्यूज.

‘पांडुरंग सहकारी’ वरती ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या असलेल्या विश्वासमुळेच कारखाना आज पर्यंतचे गाळपामधील व साखर पोती उत्पादनामधील सर्व उच्चांक मोडुन १२ लाख मे.टन गाळप व १३ लाख ७५ हजार ५५५ साखर पोती उत्पादित करून नवीन विक्रम प्रस्थापित करू शकला आहे. असे मत कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केले. ते कारखान्याच्या वतीने उत्पादनामधील सर्व उच्चांक मोडुन उत्पादित करण्यात आलेल्या १३ लाख ७५ हजार ५५५ साखर पोत्याचे पूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. साखर पोती पूजन चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांचे शुभहस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक म्हणाले की, हंगाम सुरू करतेवेळी  कारखाना सुमारे १५ एप्रिल पर्यंत चालेल असे वाटत होते. परंतू एप्रिल संपत आला तरीही आपल्याकडे सुमारे ५० हजार मे.टन ऊस शिल्लक आहे. त्याचबरोबर कारखान्याकडे असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा आज पर्यंत टिकुन राहिली. त्यामुळे कारखान्यास सर्व उसाचे गाळप करणे शक्य होईल. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी केलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप केल्यानंतरच कारखाना बंद करण्यात येईल. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हवालदिल होण्याची आवश्यकता नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी येणारी अडचण लक्षात घेऊन कारखाना व्यवस्थापनाने मालक तोड करण्यासाठी तोडणी दर वाढवून दिला आहे. तसेच ऊस उत्पादकांनाही उशीरा येणाऱ्या ऊसास प्रति मे. टन रक्कम रुपये १०० प्रमाणे वाढ दिली आहे.

विक्रमी गाळप व विक्रमी साखर उत्पादनाबद्दल कारखान्याचे सर्व ऊस पुरवठादार, शेतकरी, तोडणी वाहातुक मुकादम व मजुर, व्हा.चेअरमन कैलासराव खुळे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व सर्व खातेप्रमुख त्यांचबरोबर सर्व कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्याबद्धल धन्यवाद व्यक्त करतो. कारखान्याच्या व्यवस्थापनावर ऊस उत्पादक सभासदांच्या असलेल्या विश्वासामुळे ऊस उत्पादकांनी ‘पांडुरंग’साठी ऊस राखून ठेवला. त्यामुळेच उच्चांकी गाळप करुन आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढता आले असेही आ.परिचारक म्हणाले.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहीती दिली की, चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने आजपर्यंत १२ लाख मे. टन गाळप करुन १३ लाख ७५ हजार ५५५ साखर पोती उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा ११.४६ टक्के इतका आहे. कोजनरेशन पासुन ६.८६ कोटी युनिट वीज निर्मिती केली आहे. तर आसवनी प्रकल्पातून आज अखेर ८० लाख लिटर अल्कोहोल उत्पादन केलेले आहे. गाळप हंगाम सुरू झालेपासुन सर्व ऊस उत्पादकांची व तोडणी वहातुकदार यांची बिले वेळेत अदा केली आहेत. तसेच कारखान्याकडे शिल्लक असणाऱ्या सर्व ऊसाचे गाळप १० मे पुर्वी पुर्ण होईल. असे डॉ.कुलकर्णी म्हणाले.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलासराव खुळे, संचालक दिलीप चव्हाण, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, संगिता साळुंखे, सुशिलाबाई पाटील, कारखान्याचे प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर. कुलकर्णी, केन मॅनेजर एस.सी.कुमठेकर, चिफ अकौंटंट आर.एम.काकडे, डिस्टीलरी मॅनेजर आर.एस.पाटील, को.जन मॅनेजर सचिन विभुते, सिव्हील इंजिनिअर एच.एस.नागणे, मटेरियल मॅनेजर एम.जी.देशपांडे, संगणक प्रमुख तानाजी भोसले, सहा.अधिक्षक बी.एस.बाबर व सभासद शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!