उजनीमधून सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडले.

मागणी आल्यास सलग दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन.
टिम: विजयदिप न्यूज.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोलापूर जिल्हयासाठी वरदान असलेल्या उजनी धरणामधून कालव्यास उन्हाळी हंगामाचे पाहिले आवर्तन आज मंगळवार ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. सोडण्यास सुरवात करण्यात आली असून सुरवातील ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. यात टप्प्या-टप्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.
उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे सध्या उजनी उजवा व डावा कालवा लाभक्षेत्रातील पिकांनाही मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज निर्माण झालेली आहे. अशातच उजनी धरणामधून उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आल्यामुळे पिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. पहिले आवर्तन साधारणपणे १ महिना चालणार असून जर मागणी आली तर लगेच दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान आज मंगळवार ५ एप्रिल रोजी उजनी धरणाची पाणीपातळी ४९५.०२५ मीटर, एकूण पाणीसाठा २ हजार ७५८.८३ द.ल.घ.मी म्हणजेच ९७.४२ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा ९५६.०२ द.ल.घ.मी म्हणजेच ३३.७६ टीएमसी तर धरणाची टक्केवारी ६३.०१ टक्के एवढी आहे. तसेच धरणामधून सीना-माढा उपसा सिंचन योजनेमधून २२२ क्युसेक्स, दहिगांव उपसा सिंचन योजनेमधून १०५ क्युसेक्स, भीमा सीना जोडकालव्यामधून ३०० क्युसेक्स, तर मुख्य कालव्यातून ५०० क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे.