‘पांडुरंग सहकारी’कडून कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज बँकेत वर्ग.- आ.प्रशांत परिचारक.

टिम: विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री ‘पांडुरंग’ सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम शेतकरी ठेवीदारांच्या विविध बँक खात्यात अदा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी दिली. योवळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलासराव खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी तसेच सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले की,कारखान्याने सभासद शेतकरी यांना त्यांच्या ठेवीवर द.सा.द.शे.८ टक्के प्रमाणे ९४ लाख रुपये शेतकरी ठेवीदारांच्या विविध बँकेमधील खात्यावर अदा करण्यात आले आहेत. तसेच कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले असून सोलापूर जिल्हात सातत्याने सर्वाधिक उसदर दिलेला आहे. आदरणीय कै.सुधाकरपंत परिचारक यांचा आदर्श घेवून कारखान्याच्या सभासदांना प्रत्येक वर्षी व्याज बिल दिले जात असून यावर्षीही ठेवीदारांच्या खात्यावर व्याज बील वर्ग केले आहे.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२१-२२ हा अखेरच्या टप्यात असून या हंगामात कारखाना व्यवस्थापनाच्या मदतीने उच्चांकी गाळप करणार आहेत. पांडुरंग कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचे प्रति टन २ हजार २०० प्रमाणे पेमेंट केले असून एफ आर पी प्रमाणे संपुर्ण ऊस बिलाचे पेमेंट करणार आहोत. त्याचबरोबर तोडणी व वहातुक ठेकेदारांच्याही बिलाच्या रक्कमा वेळेवर अदा केल्या आहेत. कारखाना चालू हंगामात सुरुवातीपासून सातत्यपूर्ण गाळप करीत सुरू असून कारखान्याचे को-जनरेशन व डिस्टीलरी प्रकल्पही व्यवस्थीतपणे सुरु आहेत, को-जनरेशन मधून जास्तीत-जास्त विज व डिस्टीलरी प्रकल्पातूनही जास्तीचे उत्पादन कारखाना घेणार आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद अनामतधारक व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्यास गत हंगामात ऊस गाळपास दिला आहे, अशा ऊस उत्पादकांना त्यांच्या जमा रक्कमेच्या प्रमाणात साखर घरपोच करीत आहोत.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीप चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणु पाटील, आदि उपस्थित होते.
चालू हंगामात कारखान्याने आज अखेर १०.५४ लाख मे.टन ऊस गाळप करुन ११.९२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. को-जनरेशन प्रकल्पा-मधून ७.१५ कोटी युनिट विज निर्मीती केली आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पातूनही ६८ लाख लिटर उत्पादन घेतले आहे.