उजनी कालवा बाधितांना लवकरच मिळणार मोबदला.- कल्याण काळे.

उजनी कालवा संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश.
टिम : विजयदिप न्यूज.
पंढरपूर तालुक्यातील उजनी उजवा कालवा उपरी ते भंडीशेगाव शेळवे, खेडभाळवणी, कौठाळी, शिरढोण उपकालवा, तसेच वाडीकुरोली येथील उपफाटा २१ या कालव्यासाठी जमीनी गेल्या मात्र मोबदला मिळाला नाही. त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी मोबदला मागणी करत आहेत. उजनी कालवा संघर्ष समितीच्या वतीने २००४ पासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र यश मिळत नव्हते. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांनी उजनी कालवा संघर्ष समितीच्या सदस्यां सोबत मागील सहा महिन्यापासून पाठपुरावा केला त्याला अखेर यश आले.

सोमवार २१ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी जयंत पाटील आले असता कल्याण काळे यांनी मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ दखल घेत आज सोलापूर येथे भूसंपादन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे संचालक व इतर अधिकारी यांच्याबरोबर बैठक लावली व पिक पाणी दुरुस्ती चालू पड व बागायती दरानुसार मोबदला वाढवून देणे, भूसंपादन न झालेल्या जमिनींचे संपादन करणे, काही गावांचे अवार्ड झाले नाहीत त्यांचे तात्काळ आवार्ड करून घेणे या सूचना दिल्या असून भूसंपादन विभाग व बाधित शेतकऱ्यांसह चर्चा करून पंढरपूर येथे तक्रार निवारण संदर्भात बैठकी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष कालवा बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या कालव्यासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळणार आहे.

यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी आढीव येथे कल्याण काळे यांच्या फार्म हाऊसवर जयंत पाटील आले असताना कालवा संघर्ष समितीच्या सदस्यांची चर्चा काळे यांनी घडवून आणली व वास्तव परिस्थिती मांडली होती . त्यानंतर मंत्रालय स्तरावर काळे यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला त्यामुळेच आज शेतकऱ्यांच्या हक्काचा भूसंपादन मोबदला पदरी पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीस कल्याण काळे यांच्या सोबत उजनी कालवा संघर्ष समितीचे समाधान गाजरे, अरूण आसबे, बाळकृष्ण नागटिळक व शेतकरी उपस्थित होते.