उजनी उजवा कालवा भीमा नदीवरील जलसेतुला मोठ्या प्रमाणात गळती. कांही कालावधीसाठी आवर्तन बंद राहणार.

टिम: विजयदिप न्यूज.
उजनी उजव्या कालव्याच्या भीमा नदीवरील कि.मी ०.७५ जेलसेतूला असणारे रबरी जाइंट निसटल्यामुळे जलसेतुला मोठ्या प्रमाणात गळती सुरू असून उजनी उजव्या कालव्याचे आवर्तन कांही तासांकरीता बंद राहणार आहे. या जलसेतूच्या दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे अशी माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली.

उजनीच्या मुख्य कालव्यामधून २८ जानेवारी पासून रब्बीचे आवर्तन सुरू करण्यात आले तर उजवा कालवा मधून ६ फेब्रुवारी पासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. आवर्तन सुरू होऊन ५ दिवस झालेले आहेत. परंतु या कालव्याच्या सुरवातीलाच असलेल्या शेवरे येथील भीमा नदीवरील जलसेतुला मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्यामुळे उजनीमधून मुख्य कालव्यात सोडण्यात येत असलेला विसर्ग आज शुक्रवार दि.११ फेब्रुवारी स.८ वाजता २ हजार ७०० क्युसेक्स वरुन २ हजार क्युसेक्स तर स.८.३० वा. तो १ हजार ७०० क्युसेक्स एवढा कमी करण्यात आला असून उजनी उजव्या कालव्याचे आवर्तन कांही कालावधीसाठी बंद राहणार आहे.
भीमा नदीवरील जलसेतूचे रबर जाइंट निसटले आहे. २४ तासात दुरूस्ती होईल त्यामुळे आवर्तनावरती कांही परिणाम होणार नाही. लवकरात-लवकर आवर्तन सुरू होईल.
धिरज साळे.
अधिक्षक अभियंता,
लाभक्षेत्र प्राधिकरण, सोलापूर.