बावी, तुळशी, परितेवाडी व अंजनगांव या गावांचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यास राज्य शासनाची मान्यता.- आ.बबनदादा शिंदे

सविस्तर सर्वेक्षण करणेसाठी शासनाकडून मंजूरी.
टिम: विजयदिप न्यूज.
माढा तालुक्याची वरदायिनी असलेल्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये अनेक गावांतील सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी व अंजनगांव या गावांचा सिना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्याबाबत राज्यशासनाने मंजूरी दिली असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले कि, माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी व अंजनगांव हि गावे कायमच दुष्काळी पट्ट्यात येत आहेत. दरवर्षी पडणार्या पावसाच्या पाण्याशिवाय गावांना पाण्याचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही. सिना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ठिबक सिंचन केल्यामुळे बचत झालेले पाणी वरील गावांना देण्यासाठी त्या गावांचा सिना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली असून याचे अंतिम सर्वेक्षण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सीना-११२१/प्र.क्रं.३९२-२१/मोप्र-१ दि.०१/०२/२०२२ नुसार मुंबई येथील जलसंपदा विभागाचे अवर सचिव संदिप भालेराव यांनी कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांना आदेश देण्यात आले आहेत.
या कामासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी याबाबत दोन बैठका घेतल्या यापूर्वी प्राथमिक सर्व्हे केला होता. आता राज्य शासनाने बावी, तुळशी, परितेवाडी व अंजनगांव या गावांना ठिबक सिंचन योजनेमुळे बचत झालेले पाणी देण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्याचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्याची निविदा आठ दिवसांत काढणेत येणार असून याचा अंतिम अहवाल शासनास सादर करण्यात येईल. बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगांव (खे) या गावांना बंद पाईपलाईन प्रणालीव्दारे (PDN) ठिबक सिंचन योजनेमुळे बचत झालेले पाणी देण्यात येणार असून येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.
आ.बबनराव शिंदे.