आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मागणीला यश.

पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून शासन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणार.
टीम विजयदिप न्यूज.
राज्यातील पंचायत समिती सदस्यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर खरेदी करण्याचा अध्यादेश ग्रामविकास मंत्रालयाने काढला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तसे जिल्ह्यातील पंचायत समित्यांना कळवले आहे. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भातील मागणी केली होती त्याला यश आले आहे.

राज्यात जाणवणार्या भीषण ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३५१ पंचायत समिती मधील सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त पंचायत समिती सदस्यांनी आपल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करावेत अशी मागणी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गत आठवड्यात केली होती. असे झाल्यास यामधून जवळपास १० हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध होतील त्याचा राज्यातील ५० हजार रुग्णांना लाभ होईल असे आ.रणजितसिंह यांनी पटवून दिले होते. त्यानंतर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्यातील ८ ठिकाणी ४८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यासाठी ३८ लाख ४० हजारांचा निधी दिला आहे. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सूचित केलेल्या या पर्यायाची राज्य शासनाने दखल घेतली आहे. राज्यातील पंचायत समिती सदस्यांनी आपल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करावेत असा अध्यादेश ग्रामविकास मंत्रालयाने काढला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या अध्यादेशाान्वये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत पंचायत समित्यांना याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील आदेश काढले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे प्राथमिक लक्षणे व कमी ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.
साथीचे रोग व नैसर्गिक आपत्ती यावर उपाययोजना करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी वापरता येतो हे आपण शासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता . ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात मोठा सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरला यामधून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून द्यावेत असे निघालेल्या आदेशात नमूद केले असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्यावर बरीचशी मात करता येईल असे ते म्हणाले.