पांडुरंग सहकारी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत.

टीम: विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२०-२१ करिता देशातील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि, नवी दिल्ली यांचा प्रथम क्रमांकाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा, माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, फेडरेशनचे उपाध्यक्ष केतनभाई शाह यांचे शुभहस्ते कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी स्विकारला.

यावेळी उत्तर प्रदेशचे सचिव भुसा रेडडी, सी.ए.सी.पी.चे अध्यक्ष नवीन प्रकाश व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नॅशनल फेडरेशनचे मॅनेजिग डायरेक्टर प्रकाश नाईकनवरे हे उपस्थितत होते.
कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, पांडुरंग कारखान्याने नेहमीच सभासद शेतक-यांचे हीत जोपासले असून कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारखान्याचे कामकाज चालू असून पुरस्कार मिळविणेची परंपरा कायम ठेवत याही वर्षी कारखान्याने कार्यक्षमतेमध्ये प्रभावीपणे काम केल्यामुळे नॅशनल फेडरेशनचा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळविला आहे. सदर पुरस्काराचे वितरण नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि, नवी दिल्ली येथे झाले असून संचालक मंडळातील सहकारी व कारखान्याच्या अधिका-यांच्या समवेत हा पुरस्कार स्विकारणेत आला आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि, नवी दिल्ली ही संस्था प्रत्येक वर्षी साखर कारखानदारीमध्ये सर्वोच्च काम करणा-या साखर कारखान्यांना पुरस्कार देवून सन्मानीत करित असते.
पांडुरंग सहकारी हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्यपुर्ण उस दर जास्तीचा देत असून साखर उता-यामध्येही अग्रेसर आहे. कारखाना सर्वच बाबीतीत जिल्ह्यात नेहमी प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. कारखान्याने मागील अनेक वर्षापासून शासनाच्या धोरणाप्रमाणे ऊस दर दिलेला आहे. कारखान्याचे आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोर असल्यामुळे कारखाना ऊस दराची रक्कम, कामगारांचे पगार, माल पुरवठादारांची देणी त्याचप्रमाणे शासकीय देणेही वेळेवर देत आहे. शासनाचे कोणतेही देणे कारखान्याकडे नाही.
कारखान्याने मागिल काही वर्षापासून अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळातील ऑक्सिजन निर्मिती प्लँट, सौर उर्जा निर्मिती प्लँट, सॅनिटायझर निर्मिती प्लँट, सभासद विमा योजना, शेतकरी प्रशिक्षण, मानव विरहित वजनकाटा, रेन हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, फळ रोपे लागवड, सि.सी.टी.व्ही.चा वापर, मल्टिइंटीग्रेटेड इव्हॉपोरेशन प्लँट, कन्डेशिंग पॉलिशींग युनिट, ऑनलाईन मॉनेटेरींग सिस्टिम, शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना, सुपंत ऍ़ग्रोफार्म, सुपंत बायोफर्टीलायझर लॅब, सुपंत माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा त्याच प्रमाणे ऊस विकासाच्या विविध योजना, त्यामध्ये प्रामुख्याने ऊस पिक व्यवस्थापन दिनदर्शिका, हिरवळीचे खत वाटप, पायाभूत ऊस बेणे वाटप, प्रसारीत ऊस बेणे वाटप, मोबाईल ऍ़पद्वारे ऊस नोंदणी, कंपोस्ट खत वाटप, पाचटाचे खत, इत्यादी योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या आहेत तसेच कामगारांसाठीही अनेक सुविधा सुरू केलेल्या आहेत.
कारखान्याच्या रसायन व उत्पादन विभागामध्येही विविध प्रकारे आधुनिकीकरण केले असून त्याद्वारेही कारखान्याच्या गाळप क्षमतेचा पुरेपुर वापर केला जात आहे. वाया जाणाऱ्या साखरेचे प्रमाण नगण्य असून मिल हाऊस, बॉयलिंग हाऊसची कार्यक्षमचा वाढविली आहे. सिझनमध्ये तांत्रिक बाबीमुळे कारखाना बंद राहण्याचे प्रमाण खूपच कमी केले असून साखरेचा दर्जाही उंचावला आहे. ऊस तोडणी नंतर गाळप होईपर्यंत लागणारा कालावधी अत्यंत कमी केला असून कारखान्यामध्ये ताज्या ऊसाचे गाळप करण्यावर भर दिलेला आहे.
कारखान्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या तत्वानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करुन तेच पाणी परत कारखान्यासाठी वापरले जाते. तसेच बॉयलरसाठी ई.एस.पी ही अत्याधुनिक यंत्रणा कारखान्याने उभारलेली आहे. साखर कारखान्यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर केला जातो. तसेच कारखान्यामधील वाफेचे जादा गरम पाणी कुलिंग टॉवरद्वारे थंड करुन त्याचा पुनर्वापर केला जातो. कारखान्याने सहविज निर्मीती प्रकल्प, मिलहाऊस, बॉयलर हाऊस व बॉयलिंग हाऊसमध्ये ऍ़टोेमेशन केलेले आहे. त्यामुळे कारखान्यास लागणाऱ्या वीजेमध्ये बरीचशी बचत केलेली आहे.
कारखान्याचे अल्पावधीमध्ये १ हजार २५० मे.टन क्षमतेवरुन ६ हजार मे.टन क्षमतेचे विस्तारीकरण केले असून २२ मेगावॅट क्षमतेचा सहविजनिर्मीती प्रकल्पाची उभारणी केली आहे. तसेच प्रतिदिनी ४५ के.एल.पी.डी. क्षमतेची डिस्टीलरी उभारली आहे. आसवनी प्रकल्पातील सांडपाणी व साखर कारखान्यातील प्रेसमड याद्वारे उत्तम प्रकारच्या कंपोष्ट खताची निर्मीती कारखाना करीत आहे. कारखान्याने अल्पावधीमध्ये अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार पटकावून कारखान्याच्या वैभवात भर घातली आहे.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशातील प्रथम क्रमांकाचा मिळालेला वसंतदादा पाटील पुरस्कार कारखान्याचे चेअरमन आ. मा. प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन श्री. वसंतराव देशमुख, संचालक श्री. दिनकरभाऊ मोरे, श्री. दिलीपराव चव्हाण, श्री. हरीष गायकवाड, श्री. तानाजी वाघमोडे , श्री. अरूण घोलप, श्री. बाळासाहेब यलमार कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व त्यांचे अधिकारी यांनी स्विकारला.