इतरमहाराष्ट्र

श्री.संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची दुरावस्था.

विजयदिप न्यूज.

            श्री.संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पंचवीसचार, महाळूंग, श्रीपूर ते बोंडले या दरम्यान दुरावस्था झालेली असून या महामार्गावरती मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच या भागात झालेल्या दमदार पावसामुळे या मार्गाचा रस्ता जागोजागी उखडलेला आहे. त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती डांबर निघून माती आलेली दिसतेय त्यामुळे मागील वाहनाच्या पुढे एखादे वाहन असेल तर धूळ उडल्यामुळे मागील प्रवाशाला १० फुट अंतरावरील देखील कांही दिसत नाही. तसेच उडालेली धूळ डोळ्यात जात असल्यामुळे प्रवाशांना मुख्यत्वे करून दुचाकीस्वाराला गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागताना दिसत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम येत्या आठ दिवसात सुरू करणार असल्याचे सांगितले.

            यावर्षी सर्वत्र अतिवृष्टी झालेली असल्यामुळे जागोजागी हा मार्ग खचलेला आहे. तसेच अद्यापही जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा असल्यामुळे अवजड वाहने गेली असता रस्ता खचत आहे.

            श्री.संत तुकाराम महाराज पालखी मार्ग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला असून या मार्गास आता श्री.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५(ग) क्रमांक पडलेला आहे. त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असून या विभागाने या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती ती निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून महामार्गाच्या दुरुस्तीसाठी देण्यात येणारी वर्क ऑर्डर देखील ठेकेदारास देण्यात आलेली आहे.

            परंतु ठेकेदारास वर्क ऑर्डर दिलेली असली तरी देखील या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामास देण्यात आलेला निधि कमी पडण्याची शक्यता आहे. कारण या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी बारामती ते बोंडले दरम्यान २ कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या कामाच्या दुरुस्तीचा सर्वे पावसाळ्याच्या अगोदर झालेला आहे. परंतु पावसाळ्यात या महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे अधिक निधीची गरज भासणार आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीचा पुन्हा सर्वे करून वाढीव निधि मिळणे गरजेचे आहे. दुरुस्तीसाठी निधि कमी पडणार असल्यामुळे कामाच्या दर्जा विषयी प्रश्न चिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नवीन अतिरिक्त निधी मिळणे गरजेचे आहे.

श्री.संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ (ग) च्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदारास वर्कऑर्डर देण्यात आलेली आहे. येत्या आठ दिवसात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे या महामार्गाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचा सर्वे पावसाळ्याच्या अगोदर करण्यात आला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीच्या मागणीसाठी आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केलेला आहे.

संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर.

श्री.संत तुकाराम महाराज  राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ (ग) च्या देखभाल दुरुस्तीसाठी निधि कमी पडत असेल व जास्तीच्या निधिची आवश्यकता असेल तर केंद्र शासनाकडे वाढीव निधीसाठी पाठपुरावा करणार आहे.

खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार, माढा लोकसभा.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!