इतर

‘पांडूरंग सहकारी साखर कारखान्या’ची एफआरपी २ हजार ६०० रुपये प्रमाणे- आ.प्रशांतराव परिचारक.

उशिरा गाळपास येणार्‍या ऊसास देणार एफआरपी पेक्षा वाढीव दर.

टीम:विजयदिप न्यूज.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२१-२२ साठी गाळपास येणार्‍या ऊसास कारखान्याची एफआरपी २ हजार ६०० रुपये प्रमाणे बसत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली. ते श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ३१ वा गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषद आ.रणजितसिंह मोहित-पाटील, आ.राजाभाऊ राऊत, आ.समाधान आवताडे, आ.राम सातपुते यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ सदस्य, सभासद, ऊस उत्पादक,  कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, यावर्षी ‘पांडुरंग’ कारखान्याला विक्रमी अशा १६ लाख मे.टन ऊसाच्या नोंदी झाल्या असून हा हंगाम कारखान्यासाठी आव्हानात्मक आहे. तसेच केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली आहे. असून पांडुरंग कारखाना या हंगामात पहिल्या दिवसापासून दैनंदिन गाळप क्षमतेपैकी १ हजार ५०० ते १ हजार ६०० मे.टन ऊसाचा रस इथेनॉल निर्मिती साठी वळवणार आहे. व राहिलेल्या ५ ते ५ हजार ५०० मे.टन उसाचे गाळप साखरेसाठी केले जाणार आहे.

चालू गळीत हंगाम २०२१-२२ साठी कारखान्याकडे आडसाली ऊस ७ लाख मे.टन आहे. सदर ऊस गाळपासाठी कारखान्याला शंभर दिवस लागतील यासाठी १० ते १५ जानेवारी पर्यंत आडसाली ऊसाचे गाळप पूर्ण करावे लागणार असून जर याही पुढे १५ जानेवारी नंतर आडसाली ऊस आणावा लागला तर त्या आडसाली ऊसाला कारखाना एफआरपीपेक्षा पन्नास रुपये जास्त दर दिला जाईल. तसेच १५ मार्च ते ३१ मार्चपर्यंत खोडवा व निडवा ऊस कारखान्यास  आणला तर त्यासाठी एफआरपीपेक्षा पन्नास रुपये जास्त आणि १ एप्रिल पासून पुढे येणाऱ्या खोडव्यास एफआरपी पेक्षा शंभर रुपये ज्यादा दर दिला जाईल असे संचालक मंडळाने नियोजन केले आहे. असेही आ.परिचारक म्हणाले.

मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त ११.४१ टक्के रिकव्हरी ‘पांडुरंग सहकारी’ची असून त्याचा परिणाम म्हणून अधिकचा दर कारखाना देणार असून कारखान्याची एफआरपी २ हजार ५९१ रुपये एवढी आहे. त्यात आपण थोडीफार वाढ करून २ हजार ६०० रुपये देण्याचा प्रयत्न करू. असेही आ.परिचारक म्हणाले.

यावेळी कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी म्हणाले की, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची यशस्वी घोडदौड आ.प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून चालू हंगामासाठी कारखान्याने जास्त गळीताचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट गाठणे सर्वांसमोर मोठे आव्हान आहे. यासाठी लागणारी यंत्रणा आम्ही उभी केली असून, कारखान्याच्या सभासदांनी, ऊस उत्पादकांनी आपण पिकवलेला सर्व ऊस कारखान्यास पाठवून उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे. हा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करणेसाठी सर्वांनी एकजूट होऊन निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया.

…तर कै.सुधाकरपंत परिचारक आपणाला सुद्धा माफ करणार नाहीत.

पंढरपूर तालुक्यातील इतर कारखाने अडचणीत आहेत त्यांचे सभासद आपल्याकडे येत असून ते कुठल्या कारखान्याचे सभासद आहेत यापेक्षा ते शेतकरी आहेत या भावनेतून त्यांना मदत करण्याची भूमिका ‘पांडुरंग सहकारी’ने घेतली पाहिजे व ती भूमिका मी संचालक मंडळापुढे मांडली. कै.सुधाकरपंत परिचारक यांनी आयुष्यभर शेतकरी, शेतमजुर व कामगार यांचीच भूमिका घेतली त्यांची काळजी घेतली आणि आज आपल्या पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहेत व त्यांना जर वार्‍यावर सोडले तर कै.सुधाकरपंत परिचारक आपणाला सुद्धा माफ करणार नाहीत. जर कोणी शेतकरी अडचणीत असला तर त्याचा ऊस आपण गाळला पाहिजे.

साखर कारखानदारांना दुष्काळ, साखरेचे दर, आंदोलने आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे, या अडचणींचा तोंड देत कारखाने सुरू ठेवावे लागत आहेत. मागील काही वर्षात साखर कारखानदारीला चांगले दिवस होते, त्या काळात कांही कारखानदारांनी आणि संचालक मंडळाने फक्त आपलीच प्रगती केली, यामुळे आज बरेच कारखाने अडचणीत आले आहेत, याला पांडुरंग अपवाद आहे. कारण कै.सुधाकरपंत परिचारक यांनी कारखानदारी मध्ये कधी राजकारण आणले नाही. यामुळे आज पांडूरंग कारखान्याची प्रगती झालेली आहे, ही प्रगती पाहून मला अभिमान वाटतो.

आ.समाधान आवताडे.

पंढरपूर-मंगळवेढा, विधानसभा.

जिल्ह्यात राजकारण तसेच कांही निर्णय घेत असताना दादा आणि श्रीमंत हे नात कधीच वेगळे झाले नाही, कुठलाही निर्णय घ्यावयाचा असेल तर दादा श्रीमंतांना विचारायचे श्रीमंतांना काय वाटले तर दादांना सांगायचे त्यामध्ये कधीच अंतर पडले नाही आणि पडणार नाही. हे नाते सर्व परिस्थितीत श्रीमंतांनी जपले.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,

विधानपरिषद,

यावेळी व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख, दिनकरराव मोरे, दाजी पाटील, वामन माने, दिलीपराव चव्हाण, बाळासाहेब यलमार, शिवाजीराव गवळी, तानाजी वाघमोडे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, अरुण घोलप, भिमराव फाटे, प्रकाशराव पाटील, माळशिरसचे उपसभापती प्रतापराव पाटील, नानासाहेब मुंडफणे, राहुल रेडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!