सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गच्या विकासकामासाठी ९३ कोटी ८८ लाख निधी.- आ.रणजितसिंह मोहिते-पाटील.

आढेगाव व मोहोळ येथे रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग आणि टेंभुर्णी शहरातील मूळ रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर.
टीम विजयदिप न्यूज.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आढेगाव व मोहोळ येथे रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग आणि टेंभुर्णी शहरातील मूळ रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ९३ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांना लेखी पत्रान्वये कळवले आहे. यासंदर्भात आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.
पुणे -सोलापूर या ६५ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर आढेगाव येथे लोकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता. यामुळे येथे अपघातांचे संकट मोठे होते. या ठिकाणी हलकी वाहने व लोकांना रस्त्याच्या या बाजूकडून त्या बाजूकडे जाण्यासाठी भुयारी रस्ता हवा अशी मागणी होती. त्याचप्रमाणे मोहोळ येथील कन्या प्रशालेत समोर असेच अपघात प्रवण क्षेत्र होते. त्या ठिकाणीही रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची मागणी होती.
आ.रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. नितीन गडकरी यांनी आढेगाव येथील भुयारी रस्त्यासाठी २३ कोटी ५३ लाखांच्या कामास व मोहोळ येथील भुयारी रस्त्याच्या कामास २० कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे नितीन गडकरी यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्याशिवाय पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग टेंभुर्णी शहराला बाह्य बाह्यवळण देऊन गेला आहे. टेंभुर्णी शहरातून गेलेल्या ६.२३ किलोमीटरच्या मूळ रस्त्याच्या विकासासाठी निधीची मागणी होती. यासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाने ४९ कोटी ७२ लाखांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर केला असल्याचे त्या पत्रात नमूद असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या कामांमध्ये विशेष लक्ष घालून एवढा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. मोहोळ व आढेगाव येथे रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग होणार असल्याने येथील अपघाताला आळा बसेल. तसेच टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या जुन्या रस्त्याचा विकास झाल्याने येथील नागरिकांच्या समस्या दूर होतील अशी अपेक्षा आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.
एखाद्या शहराला बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर त्या शहरातील मूळ रस्ता राज्य शासनाकडे वर्ग केला जातो. परंतु टेंभुर्णीला बायपास होऊनही मूळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ मधील या ६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी नितीन गडकरी यांनी विशेष बाब म्हणून एवढा मोठा निधी दिला आहे. त्याशिवाय दोन्ही संतांच्या पालखी महामार्गांच्या दरम्यान असलेला अकलूज ते वेळापूर या १२ किलोमीटरच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,
विधान परिषद सदस्य.