राज्यात आजपासून कडक लॉकडाऊन लागू.

टीम विजयदिप न्यूज.
अखेर महाराष्ट्र शासनाने राज्यात ब्रेक द चेनच्या माध्यमातून लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतला असून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. या बाबतच्या निर्बंधांचे नव्याने आदेश जारी करण्यात आले असून, आज २२ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार असून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
या नियमावलीनुसार, राज्य सरकारी, केंद्रीय आणि स्थानिक प्रशासनातील सर्व शासकीय कार्यालये आता फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेने चालवावी लागणार आहेत.
मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.
खासगी प्रवासी वाहतूक (बस वगळता) केवळ अत्यावश्यक कारणासाठी करता येईल. चालक अधिक आसन क्षमतेच्या ५० टकके प्रवासीच त्यातून प्रवास करू शकतील. अत्यावश्यक सेवा किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठीच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता येणार आहे. हा नियम मोडल्यास संबंधिताला १० हजार रुपये दंड केला जाणार आहे.
खासगी बस ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी असणार आहे. या बसने दुसऱ्या शहरात वा जिल्ह्यात जाणाऱ्याला १४ दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. तसा स्टॅम्प मारण्याची जबाबदारी बस ऑपरेटरवर राहणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच स्थानिक परिवहन सेवा ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत.
लग्नाकार्यासाठी फक्त २ तासांची वेळमर्यादा दिलेली असून लग्नासाठी केवळ २५ जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे, या नियमांचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.