‘पांडुरंग सहकारी’ कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० लाख ऊस रोपांचे वाटप- आ.प्रशांत परिचारक.

५० टक्के अनुदानावर उधारीणे रोपे.
विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने फेब्रूवारी २०२२ पासून पुढे ऊस लागवड करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० लाख ऊस रोपे ५० टक्के अनुदानावर देणेत येणार असून कारखान्याच्या या योजनेचा जास्तीत-जास्त ऊस उत्पादकांनी लाभ घेवून ऊस लागवड करावी असे आवाहन चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी केले त्यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इंन्स्टीटयुट मांजरी बु.// पुणे यांनी मान्यता दिलेली सुधारित ऊस रोपे ५० टक्के अनुदानावर वाटप करणेत आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, दिलीप चव्हाण, हरीष गायकवाड, उमेशराव परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणु पाटील, केन मॅनेजर संतोष कुमठेकर व शेतकरी आदि उपस्थित होते.

यावेळी चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, आपल्या कारखान्याचा ऊस लागवड हंगाम साधारणपणे जून, जुलै या महिन्यात सुरु होऊन होतो व कारखान्याला आवश्यक असणाऱ्या एकूण ऊसापैकी सुमारे ७० टक्के ऊस लागवड ही या महिन्यात होते. त्यामुळे कारखान्याचा तोडणी प्रोग्राम राबवताना प्रत्येक वर्षी अडचण निर्माण होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गळीतास आणणेसाठी उशीर होतो. वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट मांजरी बुद्रूक पुणे यांनी शिफारस केलेली ५० लाख ऊस रोपे कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर २५ फेब्रूवारी २०२२ पासून पुढे ऊस लागवड करतील त्यांना देणेत येतील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बेणे रोपे उधारीणे देवून त्यांचा ऊस कारखान्याकडे गळीतास आलेनंतर रोपांची रक्कम वसुल करणार आहोत. कारखान्याच्या या योजनेचा जास्तीत-जास्त ऊस उत्पादकांनी लाभ घेवून ऊस लागवड करावी असे आवाहन यावेळी करणेत आले .
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, चालु गळीत हंगाम सुरु होवून चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या आडसाली ऊसाचे उशीरा गाळप झाल्याने त्याचा परिणाम कारखान्याच्या साखर उताऱ्यावर होवून साखर उतारा कमी मिळत आहे. ऊस उत्पादक सभासदांच्या ऊसाचा दर हा साखर उताऱ्यावर ठरत असल्याने कारखान्याचा साखर उतारा चांगला राहणेसाठी ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप होणे अत्यंत आवश्यक आहे. कारखान्याचा साखर उतारा चांगला राहील्यास कारखान्याच्या सभासदांना जास्तीचा ऊस दर मिळणार आहे. फेब्रूवारी, मार्च मध्ये ऊस लागवड करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा पुढील गाळप हंगाम २०२२-२३ मध्येच गाळप होणार असल्याने व तो फक्त १२ ते १३ महिन्यांतच गाळपास येणार असल्याने त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत ऊस रोपांची लागण केल्यामुळे तुट आळे होण्याचे प्रमाण खुपच कमी होवून एकरी ऊसाच्या उत्पादनात वाढ होते. तसेच अंतर मशागत, खते इत्यादीची बचत होवून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. आडसाली ऊसामध्ये अंतर पिक घेता येत नाही परंतु पूर्व व सुरु हंगामातील ऊस लागवडीमध्ये अंतर पिक घेता येते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सुरु व पुर्व हंगामी ऊसाची लागवड करावी अशी माहिती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांनी दिली.