वेळापूर उपविभागात दोन उपकेंद्राची गरज.- भाऊसाहेब मोटे.

टीम विजयदिप न्यूज.
शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी वेळापूर (ता.माळशिरस) उपविभागात दोन उपकेंद्राची गरज आहे आणि तसा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठविणार असल्याचे वेळापूर उपविभागाचे उप-अभियंता भाऊसाहेब मोटे यांनी दिली.

पिसेवाडी परिसरातील नागरीकांनी पिसेवाडी येथे वीज मंडळाचे उपकेंद्र व्हावे या मागणीचे निवेदन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोटे यांना दिले. यावेळी माजी सरपंच महादेव चव्हाण, धनंजय भाकरे, सुरेश पिसे, उमेश बनकर, उपसरपंच मोहन भाकरे, व्हा.चेअरमन महादेव ताटे, उमेश भाकरे, अक्षय माने, रामभाऊ पिसे, विष्णू साठे, शंकर पिसे आदी उपस्थित होते .
सन २०१३ मध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे पिसेवाडी येथे उपकेंद्र व्हावे या मागणीचे निवेदन दिले होते. ते मंजूरही झाले होते परंतु आचारसंहिता लागल्याने ते राहून गेले होते. येथे ग्रामपंचायतीची जागा आहे. त्या जागेत उपकेंद्र झाल्यास त्याचा फायदा पिसेवाडी व वेळापूर शेरी या परिसरातील शेतकऱ्यांना होइल. उच्च दाबाने विद्युत पुरवठा मिळेल. याबाबत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.रामभाऊ सातपुते यांना निवेदन दिले असून त्यांनीही याबाबत पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिल्याचे अमरसिंह माने-देशमुख यांनी सांगितले .
या निवेदना नंतर मोटे म्हणाले, सध्या पिसेवाडी व मळोली-साळमुख या परिसरात शेतकऱ्यांकडून उपकेंद्राची मागणी आहे. या भागात बागाईती क्षेत्र वाढले आहे. सध्या कमी दाबाने वीज पुरवठा होतो हे सत्य आहे. पिसेवाडीला एक व वेळापूर ते साळमुख या परिसरात एक अशी दोन उपकेंद्र झाल्यास या भागातील शेतीच्या पाण्यासाठी उच्च दाबाने वीज मिळेल. हा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगून ज्या शेतकऱ्यांना वाढीव बील आले असेल ते दुरुस्त करुन देवू तसेच ज्या राहोत्रीवर अधिकचा भार आहे त्या डीपीचे प्रस्ताव घेवून वाढीव भारचे प्रस्ताव मंजूर करुन घेवू असे ते म्हणाले.