पंढरपूर तालुक्यातील अडचणीत आलेल्या अन्य कारखान्यांच्या शेतकर्यांनी घाबरून जाऊ नका – आ.प्रशांत परिचारक.

‘पांडुरंग सहकारी’ची ३० वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
टीम विजयदिप न्यूज.
पंढरपूर तालुक्यातील अडचणीत आलेल्या अन्य कारखान्यांच्या सभासदांनी घाबरून जाऊ नका. तुमचे कारखाने अडचणीत आले असले तरी तुम्ही पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आहात व तुम्हाला न्याय देणे आमची जबाबदारी आहे. तुम्हाला वार्यावर सोडणार नाही. ‘पांडुरंग सहकारी’ व ‘युटोपियन’ कारखाना पंढरपूर तालुक्यातील अडचणीत आलेल्या कारखान्याच्या सभासदांच्या ऊसाचे गाळप करण्यास कमी पडणार नाही. असे प्रतिपादन ‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी केले. ते ‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखाना. श्रीपुर कारखान्याच्या ३० व्या ऑनलाइन अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

यावेळी व्हा.चेअरमन वसंत देशमुख, दिनकरराव मोरे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, दाजी पाटील, हरिष गायकवाड, बाळासाहेब यलमार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.परिचारक म्हणाले की, केंद्र शासनाने चांगले निर्णय घेतले नसते तर साखर कारखानदारी आणखी अडचणीत आली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेचा बेसिक दर ३ हजार १०० ठरवून दिला नसता तर आज साखरेचे दर २ हजार ते २ हजार २०० रुपये पर्यंत खाली आले असते. तसेच साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर इथेनॉल ग्रीडींग चा कार्यक्रम हाती घेतला. खरेतर २०२५ पर्यंत इथेनॉल ग्रीडींग चे टार्गेट होते परंतु ते दोन वर्ष अलीकडे आणून २०२३ केले.

देशात ३१० लाख मेट्रिक टन साखर बनते तर त्यापैकी २४० ते २५० लाख मेट्रिक टन साखरेची गरज खाण्यासाठी आहे. दरवर्षी ५० ते ६० लाख मेट्रिक टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होते. तसेच उसाचा जो रस होतोय तो साखरे कडे न वळवता इथेनॉल कडे वळवायचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला.
साखर विक्री करताना साखर खाणारा ग्राहक व इतर उद्योगांसाठी लागणारी साखर यामध्ये सुद्धा फरक करून त्यांची निविदा वेगळ्या पद्धतीने झाली तर निश्चितच भविष्यकाळात साखर उद्योग भरभराटीस येणार आहे.
चालू वर्षी १० ते ११ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ४५ हजार लिटर क्षमतेच्या डिस्टलरीचे विस्तारीकरण करून १ लाख लिटर पर्यंत क्षमता वाढवण्याचे काम सुरू असून हा विस्तारीकरणाचा प्रकल्प ९० कोटी रुपयाचा होता, तो कारखान्याने २५ ते ३० कोटीत बसवला आहे. चालू होणार्या गळीत हंगामापासून कारखाना दैनंदिन गाळप क्षमतेपैकी रोज ५ हजार ४०० टन उसापासून साखर निर्मिती तर १ हजार ५०० ते १ हजार ६०० मे. टन उसाचा रस इथेनॉल निर्मिती कडे वळवणार आहे.
यावेळी सभेमध्ये उपस्थितांचे स्वागत व्हा.चेअरमन वसंत देशमुख यांनी केले तर विषयाचे वाचन कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी करून एक मताने विषय मंजूर करून घेतले. ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी संचालक दिलीप चव्हाण, शिवाजी साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, नामदेव झांबरे, अरुण घोलप, नागनाथ शिंदे, महिबुब शेख, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.