विठ्ठलराव शिंदे कारखान्याची २२ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहत संपन्न.

टीम विजयदिप न्यूज.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची सन २०२०-२१ आर्थिक वर्षाची २२ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कोव्हीड-१९ चे पार्श्वभुमीवर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा.कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पद्धतीने उत्साहात संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष वामनराव उबाळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस सभेचे प्रास्ताविक व स्वागत जनरल मॅनेजर सुहास यादव यांनी केले. त्यानंतर प्रेरणास्थान कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन व्हा.चेअरमन वामनराव उबाळे यांच्या व इतर मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. श्रध्दांजली वाचन संचालक शिवाजी डोके यांनी केले.
त्यानंतर विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी केले. वार्षिक सभेच्या विषयपत्रिकेवरील १ ते २१ ठराव एकमताने मंजुर करणेत आले. बहुतांशी सभासदांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला.
अध्यक्षीय भाषणात शिंदे म्हणाले की, केंद्र शासनाने ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल साखरेचे आधारभुत किंमत करणे आवश्यक आहे, तरच ऊसाची आधारभुत किंमत देणे कारखान्यांना शक्य होईल. अन्यथा कारखाने कर्ज व त्यावरील व्याज यामुळे अडचणीत येतील. मागील हंगामात केंद्र शासनाने साखरेचे उत्पादन जास्त झालेमुळे निर्यात साखरेस अनुदान देणेचे धोरण निश्चित केल्यामुळे याचा फायदा कारखान्याना एफ.आर.पी. देणेसाठी झालेला आहे. परंतु केंद्रशासनाकडून अनुदान मिळणेसाठी विलंब होत आहे. केंद्रशासनाकडून ३८ कोटी अनुदान प्राप्त झाले असून अद्याप २० कोटी रुपये अनुदान कारखान्यास येणे बाकी आहे.
कारखानदारी अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाचा उर्वरीत शेवटचा हप्ता प्र.मे.टन रू.१७६.९८ प्रमाणे ऊस बील बँकेत जमा केले असून त्यानुसार शंभर टक्के एफआरपी अदा झालेली आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या साखर निर्यात कोट्या प्रमाणे साखर विक्री झालेली आहे. कारखान्याने सन २०२०-२१ मध्ये ७ लाख ७९ हजार ८९० क्विंटल व आजअखेर १० लाख ९६ हजार ५५० क्विंटल साखर निर्यातीसाठी विक्री केलेली आहे. साखरेस मागणी नसल्याने मागील वर्षी ४ लाख ५० हजार क्विंटल साखर कोठा लॅप्स झालेला आहे. त्यामुळे कर्ज खात्यावरील व्याजाचा भुर्दड वाढलेला आहे. केंद्रशासनाने मागील वर्षी एफ.आर.पी. मध्ये रू.१००/- व चालू हंगामासाठी रू.५०/- वाढ केलेली आहे. एफआरपी वाढत राहिली पण साखरेचे भाव वाढले नाहीत. जिल्ह्यातील ९० टक्के साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. परंतु साखरेची आधारभूत किंमतीमध्ये वाढ केलेली नाही. कारखान्याने सन २०२१-२२ हंगामामध्ये दोन्ही युनिटचे मिळून २५ लाख टन गाळप उद्दिष्ठ निश्चित केले असून ज्यूस टू इथेनॉल व बी हेव्ही मिळून ४ कोटी ५० लाख लिटर इथेनॉल उत्पादन घेण्याचे नियोजन केलेले आहे.
कारखान्याने सभासद व ऊस पुरवठादारांना दिवाळीसणासाठी सवलतीच्या दराने साखर वाटप सुरू केलेली आहे. तसेच कारखान्याने ठिबक सिंचन, कंपोष्ट खत वाटप, बेणे मळा योजना, माती व पाणी परिक्षण, प्रति एकर १०० टन ऊस उत्पादकता वाढ योजना, फळ झाडे लावा योजना, पाणी फौडेशन या उपक्रमातून सहकार्य केलेले आहे. तसेच कोव्हीड १९ चे काळात राज्यशासनाने रक्तदानासाठी केलेल्या आवाहनानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करून सभासद, ऊस पुरवठादार, वाहतुकदार, अधिकारी व कर्मचारी, कार्यकर्ते यांचे सहकार्याने ३ हजार रक्त पिशव्यांचे संकलन केले त्यामुळे कोव्हीड काळात रूग्णांना रक्ताची मदत झाली. तसेच साखर कारखान्याच्या प्रगतीच्या दृष्टीने जे-जे करणे गरजेचे आहे ते ते करण्याचा प्रयत्न राहील असे शेवटी आ.शिंदे यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार संचालक सुरेश बागल यांनी मानले.
या सभेस उपाध्यक्ष वामनराव उबाळे, संचालक शिवाजी डोके, वेताळ जाधव, रमेश येवले-पाटील, विष्णू हुंबे, लक्ष्मण खूपसे, पोपट चव्हाण, शिवाजी डोके, प्रभाकर कुटे, पांडुरंग घाडगे, पोपट गायकवाड, सुरेश बागल, निळकंठ पाटील, सचिन देशमुख, लाला मोरे, रणजितसिंह शिंदे, अमोल चव्हाण, संदीप पाटील, सिंधुताई नागटिळक उपस्थित होते.
तसेच वैधानिक लेखापरिक्षक गुंड गावडे ॲन्ड कंपनी, पुणे, वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगडे, जनरल मॅनेजर (एच.आर.) पी.ए.थोरात, जनरल मॅनेजर (प्रोसेस) पी.एस.येलपले, फायनान्स मॅनेजर डी.व्ही.लव्हटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, केन मॅनेजर एस.पी.थिटे, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस. बंडगर, सिव्हिल इंजिनिअर एस.आर.शिंदे, मार्केटिंग मॅनेजर. एन.एम.नायकुडे, ईडीपी मॅनेजर आर.एस. खेडकर, परचेस आफिसर जे.डी.देवडकर, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे व कामगार प्रतिनिधी अनिल वीर यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. शेवटी राष्ट्रगिताने सभेची सांगता करणेत आली.