‘महावितरण’ने तात्काळ वीज तोडणी थांबवावी अन्यथा आक्रोश आंदोलन- आ.राम सातपुते

टीम: विजयदिप न्यूज.
एकीकडे डान्स बारची काळजी करणारे ठाकरे सरकार दुसरीकडे मात्र माय-बाप शेतकऱ्यांची वीज तोडून जुलमी कृत्य करत आहे. ‘महावितरण’ने वीज तोडणी तात्काळ थांबवावी अन्यथा माळशिरस तालुक्यात आक्रोश आंदोलन उभे करू असा इशारा आ.राम सातपुते यांनी दिला.
पुढे बोलताना आ.राम सातपुते म्हणाले की, कोरोना काळात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यातून शेतकरी कसाबसा उभा राहत असतानाच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे वीज बिल वसुली साठी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे रोहित्र (डीपी) बंद करत आहेत. बऱ्याच ठिकाणी रोहित्र (डीपी) उतरवले जात आहेत.
वीज बिल वसुलीसाठी माळशिरस तालुक्यात शेतकऱ्यांना ८ तासाचा होणारा थ्री-फेज वीजपुरवठा २ तासावर महावितरणने आणल्याने हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिके वाया जाणार असून कोरोना महामारीत कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला असून यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनेही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप देऊन दहा ते पंधरा दिवस झाले असताना हाता तोंडाला आलेली पिके दिपवाळीच्या अगोदर बाजारात विकून यावर्षीचे दिपावळी कशीबशी साजरी करण्याचा शेतकऱ्याचा मानस असताना महावितरण कडून दीपावलीच्या तोंडावर वीज तोडणी केली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे असेही शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. महावितरणने तात्काळ वीज तोडणे, रोहित्र बंद करणे, रोहित्र उतरवणे हे थांबवावे अन्यथा तीव्र आक्रोश आंदोलनाचा इशारा आ. राम सातपुते यांनी दिला आहे.