माळशिरस तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाचे अनुदान वितरित.- जगदीश निंबाळकर.

४ कोटी २९ लाख ९३ हजार ६५० रुपये वितरित.
विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यामध्ये जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते. अशा बाधित शेतकर्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत नुकसानापोटी देण्यात येणार्या अनुदान रकमेपैकी यादयांची तपासणी झालेल्या महसुली गावांना दि.१२ नोव्हेंबर २०२० अखेर ४ कोटी २९ लाख ९३ हजार ६५० रुपये अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती माळशिरसचे तहसिलदार जगदीश निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्राकव्दारे दिली. तसेच उर्वरीत राहिलेले अनुदान वाटप जलदगतीने वितरित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकर्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत नुकसानापोटी जिराईत व आश्वासित सिंचनाखालील पिकांना प्रति हेक्टरी १० हजार तर बहुवार्षिक पिकांना प्रति हेक्टरी २५ हजाराचे अनुदान रक्कम देण्याचे निर्णय घेतला होता.
माळशिरस तालुक्यात एकूण १६ हजार ९६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २२ कोटी ९७ लाख १० हजार रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील अनुदान वितरण आदेश क्रमांक १ दि.१० नोव्हेंबर २०२० अन्वये माळशिरस तालुक्यातील शेती पिकांच्या नुकसानासाठी ११ कोटी ९० लाख ४९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. वरील प्राप्त अनुदानपैकी प्राप्त यादयांची तपासणी झालेल्या महसुली गावांना दि.१२ नोव्हेंबर २०२० अखेर ४ कोटी २९ लाख ९३ हजार ६५० रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर उर्वरीत राहिलेले अनुदान वाटप जलदगतीने वितरित करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.