शेतीविषयक

कारखानदार मोठे झाले; ऊसवाहतुकदार कधी मोठे होणार- खुपसे-पाटील.

पटवर्धन कुरोली येथे ‘जनशक्ती’ची बैठक.

टीम विजयदिप न्यूज.

कारखानदारी अडचणीत असल्याचे सांगुन कारखानदार नेहमीच शेतकऱ्यांना व ऊस वाहतुकदारांना अडचणीत आणत आहेत. मग अडचणीत असलेला कारखानदार एका कारखान्याचे २-४ कारखाने कसा उभा करतो हे न सुटलेलं कोडं आहे. मात्र जिवाची ओढाताण करुन यांच्या कारखान्याला ऊस पुरवठा करणारा अजुनही अडचणीतच आहे. डीझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरांची किंमत वाढली तरीही वाहतूक कमिशन मात्र जैसे थे आहे. आपल्या जिवावर कारखानदार भले मोठे झाले मात्र ऊस वाहतुकदार ट्रॅक्टर व ट्रक मालकांची अधोगती झाल्याचा घणाघात जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी केला.

पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे ऊस वाहतूक दर यांच्या प्रश्नासंबंधी जनशक्ती संघटनेची पहिली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते याप्रसंगी बळीराजा जिल्हा प्रमुख रामदास खराडे, विठ्ठल मस्के, बळीराजा जिल्हा प्रमुख माऊली जवळेकर, किसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर, गणेश वायभासे, रोहन नाईकनवरे, रामभाऊ खटके, अंकुश उपाळे, सागर पाटील, सोमनाथ जाधव, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खूपसे-पाटील म्हणाले की, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते आज ते १०० च्या घरात पोहोचले आहेत. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजार च्या पुढे झाला आहे. आणि टायर यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकचे कारखानदारांनी वाहतूकदर आणी कमिशन आजही वाढवलेले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी ४ ते ५ लाखांचा अ‍ॅडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादमाने सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याचे सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते. आणि याचा फटका त्यांना बसतो. असे अनेक घाव सोसल्याने हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. काहींनी आत्महत्या सारखा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे आपण वेळीच एकत्र होऊन कारखानदारांच्या विरोधात आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे.

यावेळी राजाभाऊ बिले, तानाजी जाधव, सुनील टिक, बिभीषण गमे, अनिल पाटील, सचिन शिंगटे, नितीन तकिक, गोपाळ पाटील, ज्योतिराम शिंदे, राजेंद्र झांबरे, ज्योतिराम ढोबळे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीकांत नागणे, बालाजी पांढरे, विशाल माने, शिवाजी वळेकर, पोपट केचे, बंटी गायकवाड, कविराज मोहिते, सचिन गायकवाड, गणेश ढोबळे, राणा वाघमारे यांच्यासह इतर वाहन चालक मालक उपस्थित होते.

२१ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर आंदोलन

गेल्या अनेक वर्षांपासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक मालकांचे वाहतूकदर आणि कमिशन वाढवले नाहीच शिवाय त्यांच्यावर जप्ती सारख्या कारवाया कारखानदारांकडून केल्या जातात म्हणून आपल्या मागण्या कारखानदार व शासन दरबारी पोहोचविण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी पंढरपूर मध्ये जनशक्ती संघटनेचे ट्रॅक्टर आंदोलन होणार असल्याचे अतुल खूपसे-पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!