ऊस वाहतूकदारांनी यापूर्वीच वाहतुकीचे दर वाढवून घेण्याची भूमिका ठेवायला हवी होती- राजेंद्र गिरमे.

टीम: विजयदिप न्यूज.
गळीत हंगाम सुरू झाले आहेत, त्यातच ऊस वाहतूकदारांनी वाहतूक दर वाढवून देण्यासंदर्भात आंदोलन सुरू केले आहे. ऊस वाहतूकदारांच्या पुढाऱ्यांनी यापूर्वीच वाहतुकीचे दर वाढवून घेण्याची भूमिका ठेवायला हवी होती. आता हंगाम सुरु होण्याच्या तोंडावर यांच्या पुढाऱ्यांनी ऊस वाहतुकीस खिळ घातल्याने गळीत हंगाम लांबू लागले आहेत. शासनानेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळण्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे मत माळीनगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी व्यक्त केले. माळीनगर साखर कारखान्याचा ८९ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ संजय तरडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी गिरमे बोलत होते.
ऊस वाहतूक दारांच्या संपाबाबत राजेंद्र गिरमे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, या विषयावर यापूर्वीच विचार विनिमय व्हायला हवा होता. आता गाळप हंगाम सुरू झाले की वाहतूकदारांच्या ुढार्यांनी हा प्रश्न लावून धरला आहे .त्यामुळे गाळप हंगाम लांबणीवर पडत आहेत. यंदा प्रचंड प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने तो वेळेत गाळप होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्याला या आंदोलनामुळे अडचणी येणार आहेत. हे अडवणुकीचे धोरण साफ चुकीचे असल्याचे राजेंद्र गिरमे यांनी सांगितले. यासंदर्भात शासनाचीही मोठी चूक असल्याचे ते म्हणाले. शासनाने यापूर्वीच या संदर्भात दखल घेऊन हा प्रश्न निकाली काढायला हवा होता. माळीनगर येथील दि सासवड माळी कारखान्याच्या कामगारांना १५ टक्के बोनस दिवाळीपूर्वी देणार असल्याचे राजेंद्र गिरमे यांनी जाहीर केले. यंदा कारखान्याने सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. माळीनगर कारखाना बी-हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष नंदकुमार गिरमे,उपाध्यक्ष परेश राऊत,पूर्णवेळ संचालक सतीश गिरमे,संचालक मोहन लांडे,राहुल गिरमे,अशोक गिरमे,निळकंठ भोंगळे,विशाल जाधव,निखिल कुदळे,सतेज पैठणकर,माजी व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव अनिल रासकर आदी उपस्थित होते.
साखर कारखाने म्हणजे करोडो रुपयांचे उत्पन्न घेणारे उद्योग असल्याचा समज आज समाजात होत असल्याची खंत राजेंद्र गिरमे यांनी व्यक्त केली. साखरेचे दर काहीसे वाढले मात्र त्याच बरोबर ऊसाची एफआरपी वाढली, कामगारांना बारा टक्के पगार वाढ झाली .वाढलेले साखरेचे दर येथेच जिरले आहेत. सध्या साखरेला उठाव नाही या सर्व कारणांमुळे साखर कारखानदारी सध्याच्या परिस्थितीत मोठी अडचणीत असल्याचे राजेंद्र गिरमे यांनी यावेळी सांगितले.