मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा.

मला टीकेची पर्वा नाही.- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
टीम विजयदिप न्यूज.
लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. हा आकडा वाढू नये यासाठी लॉकडाऊनबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काल जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
लसीकरणात महाराष्ट्र हे देशातले १ नंबरचे राज्य.
लसीकरणात महाराष्ट्र हे देशात १ नंबरचे राज्य ठरलेले असून आपण एका दिवासात ३ लाख नागरिकांना लसीकरण केलेले आहे. तसेच जेंव्हापासून लसीकरणाला सुरवात झाली तेंव्हापासून आपण ६५ लाख नागरिकांना लसीकरण केले आहे. केंद्र सरकार लस पुरवठा करण्यात मदत करत आहे. परंतु त्या पुरवठयात वाढ होणे आवश्यक असून तशी मागणी आपण करत आहोत व मागणी पूर्ण होईल. पुरवठा वाढल्यानंतर आपली क्षमता दिवसाला ६ ते ७ लाख नागरिकांना लसीकरण करण्याची आहे.
आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे.
आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघेन. सर्व अधिकाऱ्यांकडून आढावा घेईन. राज्यात बदल दिसला नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्याबाबतचा इशारा देतो. त्यामुळे आतापासून आपण ठरवूया. आपण ही लाट रोखूच. याशिवाय यापुढची लाटही रोखूया, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जनतेच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करु नका
मधल्या काळात कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणच त्याच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं