विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.

टीम: विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडीच्या वतीने माळशिरस पंचायत समितीच्या अखत्यारित असलेल्या शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडे दिले. यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते यांच्यासह शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. अशी माहिती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी दिली.
निवेदनात कोरोना अडचणीमुळे प्रलंबित असलेले पंचायत समिती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करणे, कोरोना कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे, मंजूर वैद्यकीय बिले अदा करण्यासाठी जिल्हा स्तरावर रकमेची मागणी करणे, कोरोना काळात विविध माध्यमातून उल्लेखनीय शैक्षणिक व कोरोना विषयक कार्य करणाऱ्या शिक्षकांची सेवा अतिउत्कृष्ट काम म्हणून नोंद घेणे, जिल्हास्तरावरून पगार रकमा गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर विनाविलंब शिक्षणाचे वेतन मिळणे, कोरोना काळानंतर शाळा सुरू करण्याचा ठराव करण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना करणे आदी मागण्यांचा उल्लेख आहे.
महिला आघाडीच्या वतीने अध्यक्ष प्रतिभा मोहिते आणि सरचिटणीस किरण घाडगे यांनी आंतरजिल्हा आपसी बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता कायम करणे, अंशदायी पेन्शन योजने तील बदलून आलेल्या शिक्षकांची मूळ जिल्ह्यातील कपात झालेली रकमा परत मिळण्याबाबत बाबत जोरदार मागणी केली.
यावेळी शिक्षक संघाचे नेते दिलीप ताटे, अशोक पवार, पांडुरंग मोहिते, संग्राम दळवी, तालुका अध्यक्ष विजय शिंदे, सरचिटणीस मनोहर एकतपुरे, कार्याध्यक्ष विजय भोसले, प्रसिद्धीप्रमुख केशव मोरे, उपाध्यक्ष विनोद थोरात, राजू गोरवे सल्लागार बाळासाहेब कांबळे, सत्यवान गायकवाड, मुख्याध्यापक श्रीमंत लोखंडे, नाथासिंग देशमुख आदी पदाधिकारी, कार्यालयीन लिपिक गायकवाड, सुरवसे, संग्राम परसेवाड, कर्मचारी महेश मालकरी उपस्थित होते.
शिक्षक संघटनांनी मांडलेले विषय सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोना काळानंतर शाळा सुरू होत असताना हक्का बरोबरच शैक्षणिक कर्तव्याबाबत शिक्षकांमध्ये जागृती करण्याचे काम संघटनांनी करावे.
धनंजय देशमुख,
गटशिक्षणाधिकारी.
माळशिरस तालुक्यातील शिक्षण विभागाचे कार्य उत्साहवर्धक आहे. शिक्षकांना प्रेरित करण्याचे शिक्षक संघाचे काम कौतुकास्पद आहे. तालुक्यातील शिक्षकांची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घेऊ.
श्रीकांत खरात,
गटविकास अधिकारी