ऊस वाहतूक बंद आंदोलनाला ‘जनशक्ती’ ने दिली स्थगिती.

वाहतूकदारांची होत असलेली कुचंबणा पाहून घेतला निर्णय.
टीम: विजयदिप न्यूज.
गेली दीड महिना राज्यभर ऊस वाहतूकदारांनी सुरु केलेल्या वाहतूक आंदोलनाला कांही कारखानदारांनी प्रतिसाद दिला असून १२ टक्के वाढ सुद्धा जाहीर केली आहे. परंतु कांही कारखानदार वाहन मालकांना दमबाजी करत असून करार रद्द करा किंवा अॅडव्हान्स जमा करा असे सांगत आहेत. त्यामुळे वाहन मालकाची होणारी कुचंबणा पाहून जनशक्ती संघटनेने ऊस वाहतूक बंद आंदोलनाला स्थगिती दिली असून याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य साखर संघ, वेस्ट इंडियन शुगर आणि साखर आयुक्तांना दिले आहे. परंतु वाहतूक दरवाढ ५० टक्के ही द्यायलाच पाहिजे. त्यासाठी संघटनेकडून दीड महिना वेळ देण्यात आला असून त्यानंतर मात्र अपेक्षित दरवाढ न दिल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे.

वाढलेल्या डिझेलच्या किमती, ड्रायव्हरचा पगार व स्पेअर पार्टचे दर पाहता ऊस वाहतूक दर किमान ५० टक्के इतका वाढवून मिळावा अशी मागणी वाहतुकदारांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी जनशक्ती संघटनेने वाहतूकदारांचा संप आंदोलन पुकारले होते. या संपामध्ये महाराष्ट्रातील ट्रक व ट्रॅक्टर चालक मालक मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मात्र अनेक कारखानदार वाहन मालकांना दमबाजी करत असून करार रद्द करा किंवा अॅडव्हान्स जमा कर अस सांगत आहेत. त्यामुळे वाहन मालकाची होणारी कुचंबणा पाहून जनशक्ती संघटनेने ऊस वाहतूक बंद आंदोलनाला स्थगिती दिली आहे.

या पत्रात पुढे म्हंटले आहे की, अनेक साखरसम्राटांनी स्वत:हून कबूल केले आहे की २०१४ पासून ऊस वाहतूकदाराला आम्ही कुठलीही दरवाढ दिलेली नाही. काही कारखानदारांनी सांगितले ऊस वाहतूक शेतकऱ्यांपेक्षा पुढाऱ्यांनाच या आंदोलनाची गरज आहे. परंतु कारखानदारांनी स्वतःच कबूल केल्याप्रमाणे पुढाऱ्यांनी यापूर्वी भाग न घेतल्यामुळे आपण यापूर्वी वाहन मालकास वाढ देण्याची दानत दाखवू शकला नाही. किमान ५० टक्के दरवाढ ही द्यायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही आपणास अजून दीड महिना वेळ देत आहोत. त्यानंतर मात्र आम्हाला अपेक्षित दरवाढ न दिल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल. कारण तोपर्यंत वाहनमालकांनी कारखान्यांकडून घेतलेला अॅडव्हान्सही संपलेला असेल आणि कारखानदार वाहन मालकास दादागिरी करू शकणार नाहीत, आणि मग तेव्हा आंदोलन अजून तीव्र स्वरूपात करून कारखानदारांना जाग आणल्याशिवाय राहणार नाही.
वाहन मालकांच्या मागणीनुसार ५० टक्के दरवाढ द्या. अन्यथा गांधीगिरी ने सुरू केलेले आंदोलन दीड महिन्यानंतर वेगळ्या पद्धतीने सुरू करून गाळप हंगाम बंद पाडू असा इशारा यावेळी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी दिला.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे अमोल चव्हाण, नितीन तकीक, अजिंक्य मोरे, रोहन नाईकनवरे, तेजस बल्लाळ, विजय बल्लाळ, तुकाराम टमके, राहुल कोटा, शरद एकाड, किरण थोरात, अतुल भोसले, दिलीप देशमुख, अजित सय्यद, राहुल दाभाडे, राणा वाघमारे देविदास तळेकर आदी उपस्थित होते.