‘पांडुरंग सहकारी’ला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर.

‘पांडुरंग सहकारी’ पुरस्कार मिळणारा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना.
टीम: विजयदिप न्यूज.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरी लि नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कारासाठी श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखान्याची निवड करण्यात आली असून गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याने साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. ‘पांडुरंग सहकारी’ला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा वसंतदादा पाटील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’ २०२०-२१साठीचा पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार मिळणारा पांडुरंग सहकारी हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. या कारखान्याने आतापर्यंत देश व राज्य पातळीवरील एकूण ३६ पुरस्कार प्राप्त केले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षमतेचा पूर्ण वापर केल्यामुळे तसेच पूर्णक्षमतेने ऊस गाळप, साखर उतारा, वेळेत दिलेले ऊस दर, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज परतफेड, ऊस वाढीच्या योजना, व्याज खर्चात केलेली बचत, गुंतवणूक, कमीत कमी उत्पादन खर्च, संचीत नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा व कारखान्याची उपलब्ध केलेला निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन अशा अनेक बाबींचा विचार करून नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरी लि नवी दिल्ली यांच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सदर पुरस्काराचे वितरण १६ नोव्हेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांनी प्रतिदिन ८०० मे.टन गाळप क्षमता असणारा खासगी कारखाना विकत घेतला व तो सहकारी करून या कारखान्याचे रोपटे लावले होते. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना त्यांनी पिकविलेल्या ऊसास योग्य मोबदला मिळाला पाहिजे व शेतकर्यांच्या उसाचे वेळेत गाळप झाले पाहिजे. तसेच कारखान्याच्या माध्यमातून ऊस पिकविणारा शेतकरी उभारी घेईल आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल या हेतूने कारखान्याची उभारणी करण्यात आली होती.