शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी – अनिल कुलकर्णी

टिम विजयदिप न्यूज
रासायनिक खताच्या वापरापासून जमिनीची होणारी हानी टाळण्यासाठी, शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून, उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल असे प्रतिपादन सेंद्रिय शेतीतज्ञ अनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते श्रीपूर(ता.माळशिरस) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजन करण्यात आलेल्या सेंद्रिय ऊस पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांशी मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे अनिल कुलकर्णी, कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक, व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे, माजी व्हा.चेअरमन दिलीपराव चव्हाण, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलताना सेंद्रिय शेती तज्ञ अनिल कुलकर्णी म्हणाले की रासायनिक खतामुळे दिवसें-दिवस जमिनीचा पोत कमी होत चालला असून त्यामुळे त्याचा पिक उत्पन्नावर मोठा परिणाम जाणवू लागला आहे. वर्षानुवर्षे आपण जमिनीमध्ये रासायनिक खतांचा मारा करत आलो आहोत. ते थांबून आपल्या जमिनी वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे, त्याचा विचार करूनच सेंद्रिय ऊस शेती या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांनी रासायनिक खतांचा वापर हळू-हळू कमी करून त्याऐवजी अभ्यासपूर्वक सेंद्रिय खते, जिवाणू खते, शेणखत, कंपोस्ट खत, जीवांमृत कल्चरचा वापर वाढवल्यास निश्चित पुढील ६ ते ७ वर्षांमध्ये पिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसुन येईल व जमिनीचा पोतही चांगला सुधारेल म्हणून शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरून आपली प्रगती करावी असे आव्हान कुलकर्णी यांनी केले तसेच विविध विषयावर मार्गदर्शन करुन शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, कर्मयोग स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी आयुष्यभर सातत्याने शेतकरी समृद्ध, प्रगत झाला पाहिजे जगाच्या स्पर्धेत तो पुढे गेला पाहिजे हीच भूमिका घेऊन ऊस, द्राक्षे, डाळिंब अशा प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याची भूमिका घेतली. पांडुरंग कारखान्याची निर्मितीही त्याच उद्देशाने झाली. त्यांचा एकच ध्यास होता की, माझा शेतकरी हा जगाच्या स्पर्धेत असला पाहिजे. त्यातूनच नवनवीन संकल्पना कारखान्यात राबवण्यात आल्या. सभासदांना बैलपोळा सणासाठी पैसे देण्याची परंपरा स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी आज पर्यंत घालून दिली आहे. तीच परंपरा पुढे चालवणे आणि समृद्ध करणे हीच खऱ्या अर्थाने मालकांना आदरांजली ठरणार आहे. असे ते म्हणाले.
पांडुरंग साखर कारखान्याचे सेंद्रिय ऊस उत्पादन दृष्टीने एक पाऊल
सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून आपण जमिनीची अवस्था काय करून ठेवली आहे याचा विचार केला पाहिजे. नवीन पिढीतील तरुणांचा विचार करून पांडुरंग साखर कारखान्याने सेंद्रिय ऊस उत्पादन दृष्टीने एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला भविष्यकाळात चांगले ऊस उत्पादक शेतकरी सभासद तयार करण्याचे ध्येय आहे.
आ.प्रशांत परिचारक,
चेअरमन, पांडुरंग सहकारी.