महाराष्ट्र

नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे पालखी मार्गाच्या जागेचा मोबदला: उपविभागीय अधिकारी- शमा पवार

निवाडा मंजूर झाल्यानंतर त्याच्या मुल्यांकन बदलण्याचे वा वाढविण्याचे अधिकार उपविभागीय कार्यालयास नाहीत.

टीम विजयदिप न्यूज.

            श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्र. ९६५ व श्री.संत तुकाराम महाराज पालखी मार्ग क्र.९६५ (ग) या महामार्गाच्या जागेचा मोबदला हा नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणेच देण्यात आला असून एकदा निवाडा मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही असे मत अकलुज उपविभागाच्या  उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी व्यक्त केले.

            उपविभागीय अधिकारी पवार या श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील वेळापूर परिसरातील ९६५ या राष्ट्रीय महामार्गावरील संपादित करण्यात आलेल्या जमिनींची पाहणी व ज्यांच्या जमिनी या मार्गासाठी संपादित झाल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी वेळापूर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

            उपविभागीय अधिकारी पवार म्हणाल्या, श्री.संत ज्ञानेश्वर व श्री.संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ज्या जागा, जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती त्या-त्या गावचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे आहे. जमिन, जागा संपादित झाल्यानंतर त्याचा मोबदला मिळविण्यासाठी जी कागदपत्रे लागतात त्याची सर्व माहिती तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनी, जागा या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाल्या आहेत त्यांनी तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पूर्तता झाली की छाननी करुन पात्र लाभार्थ्यांच्या  बॅंक खात्यात रक्कम वर्ग  केली जाते. त्यासाठी उपविभागीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात हेलपाटे घालण्याची आवश्यकता नाही.

      पालखी मार्गाचे पैसे मिळवून देण्यासाठी या कार्यालयाने कोणतीही एजन्सी नेमली नसून अशा कोणत्याही एजन्सी मार्फत पैसे मिळविण्याचा लोकांनी प्रयत्न करु नये असेही पवार म्हणाल्या . 

            पालखी मार्गात गेलेल्या जमिनी, जागा, इमारती, झाडे यांच्या नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडली जाते. त्यामध्ये तक्रार आल्यास या तक्रारीची सुनावणी घेवून निर्णय घेतला जातो. तक्रारीत तथ्य असल्यास ती सिध्द करण्याची जबाबदारी ही संबंधित तक्रारदाराची असते. पालखी मार्गात बाधित झालेल्या  शेतजमिनीस १२२० रुपये प्रति चौरस मिटर तर सन २०१७ पुर्वी अधिकृतरीत्या बिगरशेती झालेल्या जमिनीस १८९० रुपये प्रति चौरस मिटर मूल्यांकन आहे. संपादित जमिनीचे मूल्यांकन करताना या जमिनीचा रेडीरेकनर तसेच या जमिनी सारख्या इतर जमिनीची खरेदी विक्री व्यवहार विचारात घेवून केले जातात. या कार्यालयाने केलेल्या मुल्यांकनाची प्रथम छाननी प्रकल्प संचालक सोलापूर तसेच व्दितीय छाननी रीजनल हेड ऑफिस, मुंबई (एन एच आय )  यांचे कडील कमिटी करते. त्यांनी मान्यता दिल्यानंतरच निवाडा मंजूर होतो. एकदा निवाडा मंजूर झाल्यानंतर त्यातील जमिनीचे, इमारतीचे , झाडांचे मुल्यांकन बदलण्याचे वा वाढविण्याचे अधिकार या कार्यालयाला नाहीत. त्यासाठी सक्षम लवादाकडे दाद मागावी लागते असेही पवार म्हणाल्या. 

४७० कोटीचे वाटप 

श्री.संत ज्ञानेश्वर व श्री.संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा आषाढी पालखी सोहळ्यापुर्वी पुर्ण करायचा असल्याने शासनाने राज्यातील इतर राष्ट्रीय महामार्गापेक्षा या पालखी मार्गाकडे अधिकचे लक्ष दिले आहे. आज अखेर या दोन्ही पालखी मार्गावरील जागा, जमीन,  झाडे व इमारतीचा ४७० कोटी रुपयांचा मोबदला पात्र शेतकऱ्यांना  देण्यात आला आहे व १४० हेक्टर जमिनीचा ताबा हा  राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

वेळापूरला उड्डाण पूल 

श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा धर्मपुरी ते दसूर असा असून या  सुमारे ६० किलोमीटरचा आहे. या पालखी मार्गात नातेपुते व माळशिरस येथे बायपास असून वेळापूर येथे उड्डाणपूल आहे. वेळापूरचा उड्डाणपूल हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या धाव्यापासून सुरु होवून तो वेळापूर बसस्थानकाजवळ संपेल. वेळापूर बसस्थानक ते पनासेवस्ती दरम्यान जुनी हेमाडपंथी मंदिरे आहेत. या मंदिरालगतच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १०० मीटर परिसरात कोणतेही रस्त्याचे काम केले जाणार नाही. वेळापूर परिसरातील पालखी मार्गालगतची ७१ हेक्टर जमीन  संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी गट क्र. १७८४,१७८६, १७८७, १७८८, ११११, ११०६, ११०८, १११२ हे वगळण्यात आले आहेत . पालखी मार्गावर अकलूज- सांगोला  रस्ता येत असल्याने येथे धावा ते बसस्थानक असा सुमारे दिड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल होणार आहे. पालखी चौकात  साडेपाच मीटर उंच, तीस मीटर रुंदीचा उड्डाणपूल होणार आहे. त्याच्या बाजूने प्रत्येकी ७ मीटरचा सर्व्हिस रोड ठेवण्यात आला आहे. वेळापूर परिसरातील पालखी मार्गात आलेल्या जमिन, जागा, इमारती यांच्या नुकसान भरपाईपोटी  सुमारे ७० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद शाळेच्या बाधित इमारतीचे ४ कोटी २५ लाख रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग.

या पालखी मार्गात धर्मपुरी व दसूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती आल्या आहेत. त्या इमारतीच्या जागेसहित नुकसानभरपाईची ४ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम ही जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आहे. त्यामुळे आता या दोन्ही गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळा कोठे भरवाव्यात हा विषय  जिल्हा परिषदेच्या अखतारीतील आहे. दसूर शाळेचा ताबा मिळाला आहे तर धर्मपुरी शाळेचा ताबा अद्याप मिळालेला नाही.

खुडूस येथे अहिल्याबाई होळकर यांनी वारकऱ्यांसाठी जी विहीर खोदली आहे. त्या विहीरीचा परिसर वगळून माळशिरस गावातील नवे  ६ गट संपादित करण्यात आले आहेत. त्यामुळे या विहीरीला आता पुर्णतः सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस वेळापूरचे तलाठी आर.के. तोरके उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!