वेळापूर अपघातात तीन जण ठार.

एक जागीच ठार तर दोन उपचारादरम्यान.
विजयदिप न्यूज.
वेळापूर (ता.माळशिरस) येथे श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरती पनासे वस्ती उघडेवाडी चौक येथे टिप्परच्या धडकेमध्ये तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर एक जागीच ठार तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तुषार जाधव(१७) जागीच ठार, देवा माने (२८) व धनाजी माने (१८) वर्षीय युवकांचा समावेश आहे.

पोलीस नाईक विनोद साठे यांनी पाठलाग केल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याचा नातेवाइकांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे आरोप केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ व दोषींवरती लवकरात-लवकर कडक कारवाई व्हावी म्हणून नातेवाईकांनी व काही ग्रामस्थांनी वेळापूर पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, आमदार यशवंत माने, उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस संकल्प डोळस यांनी वेळापूर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस नाईक साठे यांची सोलापूर मुख्यालय येथे बदली करून सात दिवसात या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. टिपर वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चौकशी झालेवर पोलीस नाईक साठे दोषी आढळल्यास कडक कारवाई होणार अशी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी नातेवाईकांना ग्वाही दिली आहे. या दुख:त घटनेमुळे वेळापूर मधील सर्व बाजारपेठा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे सपोनि दिपक जाधव यांच्या कडून परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.